लोणी काळभोर (वार्ताहर)- हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती नंतर आता 9 मार्च रोजी थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची निवडणूक मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होणार आहे. मात्र कारखान्याची निवडणूक झाल्यावर तरी गेली 13 वर्षे बंद असलेला यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू होणार की नाही, हा मोठा गहन प्रश्न सर्वसामान्य शेतकरी सभासदांच्या पुढे आ वासून उभा आहे.
हवेली कृषी उत्पन्न बाजार समिती कारखान्या संदर्भात सकारात्मक भूमिका घेऊन कारखान्याची जमीन विकत घेऊन कारखान्याला मदत शकते. कारखाना चालू झाला तर आयुष्यभर निवडणूका लढवता येतील; परंतु कारखाना सुरू झाला नाही तर ही शेवटची निवडणूक असेल. हे पॅनेल प्रमुख व इच्छुक उमेदवारांच्या गावीच नाही. राजकीय परिस्थिती, सध्याचा काळ व कारखाना सुरू करण्यासाठी आवश्यक गोष्टी, कारखान्यावर आजच्या मितीला असलेला कर्जाचा डोंगर, कारखाना सुरू करण्यासाठी लागणारे पैसे, सभासद शेतकरी, कामगार व बँका यांची देणी या संदर्भात सविस्तर आर्थिक अभ्यास कुणीच केलेला नाही. निवडणूक झाली म्हणजे कारखाना सुरू होईल एवढी सोपी गोष्ट नसल्याची जाणीव एकाही इच्छुक उमेदवाराला नाही.
सध्या कारखान्यावर 149 कोटी रुपये कर्ज आहे. वन टाईम सेटलमेंट (ओटीएस) केल्यावर हे कर्ज कमी होऊ शकते; मात्र ओटीएस करायला पैसे आणायचे कुठून हा मोठा प्रश्न आहे. आणखी कर्ज घेऊन कारखाना सुरू केल्यास कर्ज व त्यावरील व्याज दिल्यामुळे इतर कारखान्यांच्या तुलनेत साधारण एक हजार रुपये प्रतिटन बाजारभाव शेतकर्याला कमी मिळेल. अशावेळी कोणता शेतकरी कारखान्याला उस देईल, असा विचार कुणीही केलेला नाही. गेली 13 वर्षे कारखान्याचे कार्यालय बंद असल्याने नवीन पिढी कारखान्याचे सभासद होऊ शकलले नाहीत.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धर्तीवर या निवडणुकीतही हवेली तालुक्यातील जे सभासद आहेत अशा युवा नेतृत्वाला वाव मिळणार आहे. त्यामुळे या निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. आगामी काळात जिल्हा परिषद व पंचायत समितीची ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता कारखान्याच्या निवडणुकीत माघार घेतो; परंतु जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीत तुम्ही मला मदत करायची असा शब्द घेण्यासाठी अनेकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
21 हजार सभासद, 1200 कामगारांच्या स्वप्नावर पाणी
तत्कालीन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, खासदार व आमदारांनी यशवंत सहकारी साखर कारखाना आहे त्या ठिकाणावर सुरू करणार अशी घोषणा गेल्या 13 वर्षांत अनेकवेळा केली; परंतु तो अद्याप सुरू न झाल्याने सुमारे 21 हजार शेतकरी सभासद व 1200 कामगार यांच्या आशेवर पाणी पडले आहे. या सर्व कारणांमुळे जनतेच्या भावना तीव्र झाल्या आहेत.
जमीन विक्रीचे घोडे अडलेलेच
कारखान्याच्या मालकीच्या 118 एकर जमिनीची विक्री करून बँकेची देणी भागवून उर्वरित रक्कमेतून कारखाना सुरू करण्याचे नियोजन होते; परंतु जमीन विक्री प्रक्रियेत कुठे घोडं अडतंय हे अद्यापही न सुटणारे कोडं असून राजकीय पटलावर काही हालचाली होऊन खोडा निर्माण झाल्यामुळे ’म्हाडा’च्या फाइलपासून रोडावलेले विक्री प्रक्रियेचे गाडे पुढे न सरकल्याने यामध्ये नेमके काय गौडबंगाल आहे, हे कोणासही समजेनासे झाले आहे.
जाणूनबुजून अडचणी?
वाढत्या नागरीकरणामुळे यशवंत कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार नाही असा काहींचा आक्षेप आहे; मात्र कमी गाळप क्षमता असलेला कारखाना सुरू करावा ही शेतकरी सभासदांची इच्छा आहे. संस्थापक अण्णासाहेब मगर यांनी रक्ताचे पाणी करुन माळरानावर कारखाना उभा केला. त्यांच्या कार्याची आठवण चिरंतन असावी म्हणून कारखाना सुरू होणे गरजेचे आहे. यशवंत पुन्हा पुर्ववैभवांत सुरू व्हावा ही सर्व शेतकरी सभासद, कामगार व नागरिकांची इच्छा आहे; परंतु राजकारणी याप्रश्नी जाणूनबुजून अडचणी निर्माण करत असल्याने ते नाराज आहेत.