श्रीगोंदा, (प्रतिनिधी) – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला मागील आर्थिक वर्षात ८६ लाख ५६ हजार ४ रुपयांचा उच्चांकी नफा झाल्याची माहिती समितीचे सभापती अतुल लोखंडे यांनी दिली. दरम्यान, समितीच्या उत्पन्नात जवळपास चाळीस टक्क्यांची वाढ होऊन २ कोटी ५ लाख ३५ हजार ७१७ रुपयांवर गेल्याचे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत बोलताना सभापती लोखंडे म्हणाले, मागील काळातील पदाधिकारी आणि सचिवांनी समितीच्या विकासाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. बाजार समितीकडे निव्वळ राजकीय दृष्टीने पाहिले गेल्याने समिती अपेक्षित प्रगती करू शकली नाही. शिवाय, बाजार समितीच्या उत्पन्नात मोठी गळती असल्याने ते नेहमीच मर्यादित राहिले.
एक वर्षी बाजार समिती तोट्यात आहे. बाजार समितीला निवृत्त कर्मचाऱ्यांची देणी आहेत. लोखंडे पुढे म्हणाले, मागील आर्थिक वर्षात बाजार समितीला २ कोटी ५ लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यातून १ कोटी १८ लाखांचा खर्च झाला आहे. तर ८६ लाख ५६ हजार रुपयांचा नफा झाला आहे. एकीकडे उत्पन्नात वाढ होताना दुसरीकडे वार्षिक खर्च मागील वर्षीच्या तुलनेत २२ लाखांनी कमी झाला आहे.