पुणे – नवरात्रौत्सवात कन्यापूजनाचा विधी मोठ्या भक्तिभावाने केला जातो. घरात जेव्हा मुलीचा जन्म होतो तेव्हा “देवी आली, लक्ष्मी आली’ असे म्हणण्याची श्रद्धा आहे. म्हणून, कन्यापूजन भक्तिभावाने केले जाते. याच श्रद्धेचा भाग म्हणून नांदेड सिटी येथील मंगल भैरव कोजागरी कमिटीतर्फे नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कन्यापूजन विधीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी अडीचशेहून अधिक कन्यांचे (छोट्या मुलींचे) पूजन करण्यात आले, ही माहिती उत्सव प्रमुख गिरीश घारे आणि संतोष भोर यांनी दिली. या उपक्रमाचे समन्वयक म्हणून ऍड. रवींद्र वाघमारे आणि खजिनदारपदी प्रताप दशवंत यांनी काम पाहिले. या उपक्रमावेळी स्वयंसेवकांसह महिलांचा सहभागही उल्लेखनीय होता.
कन्यापूजनाचे महत्त्व
नवरात्रौत्सवात कन्या म्हणजेच कुमारिकांच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. कन्यापूजन केल्याने देवी तिच्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करते आणि ऐश्वर्य प्राप्त होते, अशीही श्रद्धा आहे. कुमारिकांच्या पूजनानंतर त्यांना वस्त्र-विशेष करून लाल रंगाचे कपडे, फळे आणि मसाला दूध, खीर अथवा गोड पदार्थ दिले जातात. दोन ते दहा वर्षे वयोगटातील कुमारिकांचे यावेळी पूजन केले जाते. या मुलींना देवीचे रुप मानले जाते आणि या काळात मुलींना भोजन दिल्यास सुख, शांती आणि समृद्धी येते. सर्वप्रकारचे दोष नष्ट होतात, अशी श्रद्धा आहे.