संध्याकाळी बाबा कामावरून घरी आल्यानंतर त्यांनी संजीव आणि संगीताला सहज विचारलं, “दिवाळीच्या सुट्टीत आपण बाहेर कुठेतरी फिरायला जायचं का?’ संजीव लगेच म्हणाला, “बाहेर? नको नको बाबा. बाहेर किती ऊन असतं. सतत आपल्या घामाच्या धारा पुसा. नाहीतर पंख्याखाली बसा, असंच झालंय माझं.’ संगीताही तेच म्हणाली, “हो बाबा, त्यापेक्षा आपण घरीच थांबूया. खेळ खेळूया. नवीन सिनेमे पाहूया.’ आई मुलांचं बोलणं ऐकून पटकन म्हणाली, “अरे, असं काय करताय. सुट्टीचा सदुपयोग आपण करायला हवा.’
बाबा म्हणाले, “मुलांनो, सर्व ऋतू हातात हात घालून एकत्र आले तरच ऋतूचक्र पूर्ण होईल. प्रत्येक ऋतूची एक वेगळी कहाणी असते बाळांनो. “कहाणी? म्हणजे हो काय बाबा?’ संगीताने विचारले. संगीता सातवीत शिकते आणि प्रश्न विचारून अनेकांना भंडावून सोडते. संजीव आठवीत शिकतो. आईसारखा कवीमनाचा.
“अगं, ऋतूंची कहाणी म्हणजे, आता हे बघ…
फाल्गुन, चैत्रात, फुलून येतो वसंत
पानापानांत चैतन्य, नसे सृष्टीला उसंत
वैशाख, ज्येष्ठात, ग्रीष्माचा तडाखा
त्यातही गुलमोहर, हसतो सारखा
आषाढ, श्रावणात, पावसाच्या सरी
शेत डोलते झोकात, सुख येते घरोघरी
भाद्रपद, आश्विनात, शरदाचे चांदणे
शोभिवंत आकाश, गाई सुरेल तराणे
कार्तिक, मार्गशीर्षात, हेमंताचा गारवा
हुरडा, शेकोटीला चला, सांगे अवखळ पारवा
पौष, माघात, शिशिराचे आगमन
पानगळीनंतर पुन्हा, उमलते पाचूचे बन
प्रत्येक ऋतूचा, आहे महिमा वेगळा
नाना रूपांतून भरे, इथे निसर्गाची शाळा
मुलांनो हे ऋतूचक्र आपण समजून घेतलं पाहिजे. त्यातला आनंद शोधला पाहिजे. मला सांगा, घरात बसून ऋतूचक्र समजेल का?’आई म्हणाली, “आणि मुलांनो, उन्हाला कसले भिता रे. अरे, उलट उन्हाला टाळी द्यावी. उन्हाचे घर सावलीत बांधावे.’ “ये आई, म्हण ना तू कविता. तू छानच म्हणतेस कविता.’ संगीताचा बालहट्ट सुरू झाला.
“बरं बाई म्हणते…
झाडाच्या फांदीवर, बांधला झोपाळा
खेळ असा खास, विसरूनी जगास
झोपाळ्यावर बसूया, आता तासन् तास
झाडाच्या सावलीत, गप्पा रंगती नाना
झोपाळ्यावर बसायला, बोलावू पाखरांना
मुले खेळ खेळतात, वाऱ्यासंगे पळतात
झोका उंच घेऊन, आकाशाशी बोलतात
झोके घेती भरभर, फांदी वाजे करकर
आनंदाचे गाणे, साऱ्यांच्या ओठावर
मुले गात बसतात, कुणावर न रुसतात
टाळी देत उन्हाला, खूप खूप हसतात
संगीता टाळ्या वाजवत म्हणाली, “ए, छानच गाणं आहे हे. खूपच आवडलं मला. खरंच, आपण जाऊया या सुट्टीत बाहेर. संजीवदा जाऊया ना रे.’ “पण कुठे जायचं?’ संजीवने विचारलं. “कोकणात जाऊया.” बाबा म्हणाले “कोकणात कुठे हो बाबा? कोकण केवढं मोठ्ठं!’ संगीताने उत्सुकतेने म्हणाली. “आपण रायगडलाच जाऊ.’ संजीव, संगीता एका सुरात म्हणाले.
दोन दिवसातच सहलीचे व्यवस्थित नियोजन करून खासगी वाहनाने सारे रायगडला निघाले. तेही गप्पा, गाणी, कविता म्हणत. अंताक्षरीचा खेळ खेळत त्यांचा प्रवास अगदी आनंदात सुरू झाला. ते रायगड जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण माथेरानला गेले. माथेरान हे एक वृक्षाच्छादित असलेले मीटर उंचीवरील एक थंड हवेचे ठिकाण आहे हे त्यांना नव्याने कळले. माथेरानमधील कितीतरी पिकनिक स्थळे त्यांनी पाहिली. पॅनोरामा पॉईंट, किंग जॉर्ज पॉईंट, इको पॉईंट, लॉर्ड पॉईंट, वन ट्री हिल पॉईंट, पेमास्टर्स पार्क, पोर्कूपाइन पॉईंट (सनसेट पॉईंट), रामबाग पॉईंट, ऍलेक्झांडर पॉईंट,
लुईओसा पॉईंट इत्यादी पिकनिक पॉईंटने तर त्यांच्या आनंदात आणखी भर घातली. येथे सर्वांनी घोड्यांची सवारीसुद्धा केली. त्यांनी चवदार तळे पाहिले. बाबांनी चवदारतळे सत्याग्रह मुलांना समजावून सांगितला. चवदारतळे सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध असून या लढ्याची स्मृती तसेच समतेचे प्रतीक म्हणून दरवर्षी वीस मार्च हा दिन चवदारतळे सत्याग्रह वर्धापन दिन साजरा केला जातो, हे सांगितले. त्यांनी अलिबाग समुद्रकिनाराही पाहिला. समुद्रकिनाऱ्यावरील सर्व मजेदार वॉटर स्पोर्ट पण मुलांनी अनुभवले.
आई बाबांनी घरी आल्यावर मुलांना विचारले, “कशी झाली सहल?
संगीता म्हणाली, “एक नंबर ..!”
संजीवने तर खिशातून एक कागदच काढला. त्यावर त्याने एक कविता लिहिली होती. तो ती कविता वाचू लागला।
“बाबा म्हणाले , कोकणात सहलीला जाऊ
रायगड जिल्ह्यातील काही, ठिकाणं चला पाहू
रायगडमधील थंड हवेचे, ठिकाण माथेरान
वृक्षराजींसोबत मस्त, आल्हाददायक हवामान
वरदविनायक, मंदिराचा अनोखा थाट
आजूबाजूचा प्रदेश सारा, झालाय तोंडपाठ
रायगडमधील महाडचे, शांत चवदार तळे
पाण्याच्या सत्याग्रहावेळी, अशांत का ते कळे
रायगडमधील रायगड किल्ला, लक्ष वेधून घेई
ऐतिहासिक परंपरेची, साक्ष सदैव देई
रायगडमधील मुरूड जंजिरा, भव्य उभा जलदुर्ग
पराक्रमाच्या सांगून कथा, साहसाचा दावितो मार्ग
रायगडमधील अलिबागचा, सागरकिनारा पाहून
आळसाला पळवूनी येथे, चैतन्याने येते उसळून
रायगड दर्शनाच्या निमित्ताने, मनसोक्त फिरून झाले
आनंदाच्या नव्या वाटांत, मन माझे गुंतून गेले..!
बाबा, आई आणि संगीताला वाटले, आपल्या मनातील भावनाच संजीवने त्याच्या कवितेतून सहज उलगडल्या आहेत. उन्हाच्यावेळीसुद्धा सुखद गारव्याचा अनुभव या सहलीने घरातल्या प्रत्येकाला दिलाय या विचाराने अख्खे घरच आता हरखून गेले होते.
एकनाथ आव्हाड