फलटण (प्रतिनिधी) –जाधववाडी (फलटण) ग्रामपंचायत हद्दीत पक्की घरे असणाऱ्यांना घरकुले मंजूर झाल्याने या योजनेची चौकशी करावी, अशी मागणी दत्तात्रय पांडुरंग मदने यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या निवेदनात मदने यांनी म्हटले आहे की, जाधववाडी ग्रामपंचायत हद्दीतील पाच ते सहा ग्रामस्थांची पक्की घरे असूनदेखील त्यांना घरकुले मंजूर झाली आहेत. आपल्याला घरकुल मंजूर व्हावे, अशी मागणी गेली पाच-सहा वर्षे ग्रामसभेत करत आहे; परंतु कोणीही दाद देत नाही.
ग्रामसेवक विजय निंबाळकर हे अरेरावीची आणि एकेरी भाषा वापरत आहे. ज्यांना रहायला घरे नाहीत, त्यांना घरकुले मंजूर होत नाही. ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सल्ल्याने गाव पुढाऱ्यांनी पक्की घरे असलेल्यांना घरकुले मंजूर केली आहेत.
पक्की घरे आणि आर्थिक स्थिती चांगली असलेल्या, नोकरी करणाऱ्या नागरिकांना आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांना घरकुले मंजूर करण्यात आली आहेत. गरीब व गरजू नागरिकांचा समावेश घरकुल योजना यादीत करण्यात येत नाही. त्यामुळे ग्रामसेवक विजय निंबाळकर आणि घरकुले मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची चौकशी करावी.