पुणे – भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे (साइ) खेळाडूंच्या सराव सत्राला सोमवारपासून प्रारंभ झाला. मात्र, पतियाळा, बंगळुरूसह देशात विविध ठिकाणी लॉकडाऊनमुळे खेळाडूंना आपापल्या केंद्रातच सराव करावा लागत आहे.
करोनाचा धोका वाढल्याने देशात लॉकडाऊन करण्यात आले त्यामुळे जवळपास 2 महिन्यांनी या खेळाडूंना सरावाची परवानगी देण्यात आली आहे. सराव सत्राला प्रारंभ झाला असला तरीही साइच्या एकाच केंद्रात खेळाडूंना सहभागी होत आलेले नाही. त्यामुळे पतियाळा, उटी, बंगळुरूसह अन्य ठिकाणी राष्ट्रीय विक्रमाची नोंद करणारी हिमा दास हिच्यासह अनेक खेळाडूंना निवासी केंद्रातच सराव करावा लागत आहे. सरकारने ज्या ठिकाणी करोनाचा धोका सर्वात कमी आहे तेथील मैदाने तसेच क्रीडा संकुले सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती.
जगभरात पसरलेल्या करोनामुळे क्रीडाक्षेत्रालाही मोठा फटका बसल्याने अनेक स्पर्धा रद्द झाल्या तर काही स्पर्धा लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. यंदा होणारे टोकियो ऑलिम्पिकही एक वर्ष पुढे ढकलले गेले आहे. अशा स्थितीत अन्य देशांप्रमाणे भारताच्या काही खेळाडूंना आता स्पर्धेसाठी पात्र होण्याची नामी संधी मिळालेली आहे. त्यामुळे सराव सत्र लवकर सुरू करण्याचा साइचा प्रयत्न होता.
पुणे-मुंबईतही सराव सुरू होणार ?
देशात जिथे करोनाचा धोका फारसा नाही तेथील मैदानांवर साइकडून सराव सुरू करण्यात आला असला तरीही राज्यातील मुंबई व पुण्यांसह 11 महापालिका क्षेत्रात रेडझोन असल्याने येथील केंद्रात मात्र सराव सुरू करण्यात आलेला नाही. येत्या काळात परिस्थितीचा आढावा घेत याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.