मुंबई – भारतात होत असलेल्या आगामी एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेसाठी संघ निवडण्यासाठी आयसीसीने दिलेली मुदत जवळ आलेली असतानाही बीसीसीआयकडे परिपूर्ण निवड समिती उपलब्ध नाही. त्यामुळे 29 ऑगस्टपूर्वी संघ निवड जाहीर करायची असेल तर बीसीसीआयला त्यापूर्वी परिपूर्ण निवड समिती अस्तित्वात आणावी लागणार आहे.
हा संघ प्राथमिक निवडीचा असून त्यातील कोणाला दुखापत झाली किंवा अन्य कोणत्या कारणाने संघात बदल करायचा असेल तर त्याला आयसीसीची मान्यता आहे. मात्र, दिलेल्या तारखेपूर्वी बीसीसीआयला आयसीसीकडे संघाची यादी सोपवावी लागणार आहे.
संघ निवड जाहीर करतानाच सपोर्ट स्टाफही घोषित करावा लागतो.
त्यामुळे या स्पर्धेसाठीही मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडच असणार का असा सवाल निर्माण झाला आहे. त्यातही सध्या निवड समितीवर हंगामी अध्यक्ष म्हणून शिवसुंदर दास कार्यरत आहेत. मात्र, त्यांच्या जागी पूर्णवेळ अध्यक्ष नियुक्त करणे गरजचेचे आहे. एखदा नव्या अध्यक्षाची घोषणा झाली की लगेचच संघ निवड केली जाईल, असे बीसीसीआयचे म्हणणे आहे.
स्टिंग ऑपरेशनमुळे चेतन शर्मा यांना राजीनामा द्यावा लागला होता व त्यांच्या जागी हंगामी अध्यक्ष म्हणून शिवसुंदर दास यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, आता आशिया करंडक तसेच त्यानंतर होत असलेल्या एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धेसाठी परिपूर्ण निवड समितीनेच संघ जाहीर केला पाहिजे, असेही आयसीसीच्या नियमांत असल्याने बीसीसीआयला लवकरात लवकर अध्यक्ष नियुक्त करावा लागणार आहे.