पाटण -पाटण तालुक्यातील धरणांची अपुरी व प्रलंबित कामे लवकरच पूर्ण होतील, असे आश्वासन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व जिल्हा बॅंकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांना दिले.
पाटण तालुक्यातील अनेक धरणांची कामे निधीअभावी आणि इतर तांत्रिक बाबींमुळे अपुरी व प्रलंबित आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना पाणीटंचाई व शेतीच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. या समस्यांसंदर्भात जयंत पाटील यांनी मंत्रालयात बैठक घेतली. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतजमिनीच्या नुकसानीचा मुद्दा सत्यजितसिंह पाटणकर यांनी उपस्थित केला. नुकसानग्रस्तांना योग्य नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली. बैठकीस आ. शशिकांत शिंदे, उपसचिव चिले, अप्पर मुख्य सचिव गगराणी, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे सचिव तथा कार्यकारी संचालक राजपूत,
कृष्णा खोरे विकास महामंडळाचे मुख्य अभियंता धुमाळ, सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता सुरेन हिरे तसेच जलसंपदा व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधिकारी, पाटण पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ शेलार, जिल्हा परिषदेचे माजी सभापती राजेश पवार, पाटण तालुका दूध संघाचे चेअरमन सुभाषराव पवार उपस्थित होते. पाटणकर म्हणाले, “बिबी, निवकणे व साखरी (चिटेघर) धरणांची कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने तातडीने निधी मंजूर करावा,अतिवृष्टीमुळे अनेक गावांतील रस्ते, घरांचे, शेतीचे प्रचंड नुकसान झाले. अनेक ठिकाणी नदीपात्रातील शेती वाहून गेली आहे. शासनाने तातडीने या बाधितांना योग्य मदत द्यावी. अतिवृष्टीमुळे नदीपात्रात आलेला गाळ व कचरा पावसाळा सुरु होण्यापूर्वी काढण्यात यावा. वारंवार पूर येतो त्या गावांत नदीपात्राशेजारी संरक्षक भिंत उभारण्यात यावी.
”कोयना प्रकल्पग्रस्तांना पोपळी जलविद्युत केंद्र संकुलात नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावे, निवकणे, साखरी (चितेघर), बिबी धरणांतर्गत मंजूर 9 के. टी. वेअरसाठी 10 ते 15 कोटी रुपये निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणीही त्यांनी केली. ही कामे लवकरच मार्गी लावण्यात येतील व त्यासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासन जयंत पाटील यांनी दिले. नदीपात्रातील गाळ काढणे, संरक्षक भिंत उभारणे व जलविद्युत प्रकल्पाच्या ठिकाणी नौकाविहार करण्यास परवानगी देणे या बाबींचाही गांभीर्याने विचार करुन आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे सदस्य बापूराव जाधव, दूध संघाचे संचालक विजय शिंदे, संदीप पाटील, आप्पा देसाई, व्ही. के. सपकाळ, नयन पाटणकर, आनंदा संकपाळ, हणमंत शिंदे, सुनील शिंदे, रमेश लोहार आदी प्रमुख उपस्थित होते.