चंद्रपूर – देशभरात काही विशेष रेल्वे सुरु करत केंद्राने मजुरांना दिलासा दिला आहे. मात्र गावाकडे जाण्याची आस लागलेले मजूर थेट बाहेर पडू लागले आहेत. चंद्रपुरात 1000 बांधकाम मजुरांनी रस्त्यावर ठिय्या मांडला असल्याचे दिसून आले.
चंद्रपूरच्या निर्माणाधिन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकामस्थळी उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालचे मजूर कामासाठी आले आहेत. या बांधकामाचे कंत्राट शापोरजी-पालनजी कंपनीकडे आहेत. लॉकडाऊन दरम्यान हे काम बंद आहे. मात्र कंपनीने या मजुरांना मजुरी तसेच रेशन काहीही दिलेले नाही. यामुळे संतापलेल्या कामगारांनी काही काळासाठी महामार्ग अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच आम्हाला गावाला जाऊ द्या, अशी मागणी केली.
चंद्रपूर जिल्ह्यातील महत्त्वाचे रेल्वे स्थानक असलेल्या बल्लारपूर येथून मजूर स्पेशल रेल्वे गाडी बिहार, झारखंडच्या दिशेने रवाना होण्याच्या 12 तासांच्या आतच त्याचे वेगळे परिणाम दिसू लागले आहेत. या रेल्वेस्थानकापासून केवळ काही किलोमीटर अंतरावर असलेल्या चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इमारत बांधकामस्थळी कामावर असलेले मजूर अचानक महामार्गावर येऊन आंदोलन केले.
चंद्रपूर -बल्लारपूर वळण मार्गावर ही नवी इमारत होऊ घातली आहे. बांधकाम कंपनी शापूरजी -पालनजी यांच्याकडे बांधकामाचे कंत्राट आहे. इथले बांधकाम दीड महिन्यांपासून बंद आहे. मात्र इथला मजूर वर्ग काम नसल्याने व मजुरी मिळत नसल्याने संतापला आहे. सोबतच कंपनीने आश्वासन दिलेले रेशन देखील अदा झाले नसल्याने या संतापात भर पडली. आज सुमारे पंधराशे बांधकाम मजूर अचानक चंद्रपूर- हैदराबाद महामार्गावर आले व त्यांनी काही काळ महामार्ग रोखण्याचा प्रयत्न केला.
घटनास्थळी तातडीने पोलीस व महसूल विभागाचे अधिकारी दाखल झाले. सोबतच वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोरे यांनी देखील मजुरांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या दीड महिन्यात कंपनीतर्फे केवळ आश्वासने दिली गेली आहेत. त्यामुळे आमच्या गावी जाण्यासाठी आम्हाला मुभा द्यावी, अशी मागणी या कामगारांनी केली. दरम्यान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या कामगारांच्या प्रतिनिधींनी सोबत बैठक घेवून त्यांना रेशनची व्यवस्था करून देण्याचे आश्वासन देत समजूत काढली.