धुळे – राजस्थानमधील कोटा येथे अडकलेले राज्यातील विद्यार्थी त्यांच्या स्वगृही सुखरूप पोहोचले आहेत. यात धुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता. या विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासण्या केल्यानंतर त्यांना त्यांच्या पालकांकडे सोपविण्यात आले. या विद्यार्थ्यांना चौदा दिवस होम क्वॉरंटाइन राहण्याचे आदेश देखील करण्यात आले आहेत. आपल्या पालकांसोबत घरी जाताना या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद बघावयास मिळाला.
राजस्थान राज्यातील कोटा येथे देशभरातून विद्यार्थी प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी येतात. यात महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांचा समावेश असतो. दरम्यान, देशात करोना विषाणूचा संसर्ग वेगाने पसरू लागल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्याता आली. परिणामी अनेक राज्यातील विद्यार्थ्यांसोबत महाराष्ट्रातीलही अनेक विद्यार्थी राजस्थानमध्ये अडकून पडले. या विद्यार्थ्यांना अखेरीस महाराष्ट्रात आणण्यात आले आहे. गेल्या महिन्याभरापासून हे विद्यार्थी एकाच जागी अडकून होते.
राज्य सरकारने विद्यार्थ्यांना स्वगृही परत आणण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एसटीच्या धुळे विभागातून 70 बसेस कोटाकडे रवाना झाल्या. या बसेसमधून राज्यातील कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थ्यांना स्वगृही पोहोचविण्यात आले. या विद्यार्थ्यांना पालकांच्या स्वाधीन करण्याआधी पालकांना, विद्यार्थ्यांना काही सूचना करण्यात आल्या आहेत. या 14 दिवसांच्या दरम्यान कुठलाही त्रास जाणवल्यास तातडीने शासकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.