बुलढाणा : कोरोना विषाणू आपला विळखा पक्का करीत असताना शासनाने देशात लॉकडाऊन जाहीर केले. तसेच विविध उपाययोजना करून कोरोनाला थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी कामांनाही स्थगिती देण्यात आली. यामागे कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये हा उद्दात्त हेतू होता. लॉकडाऊन कालावधीत काम नसल्यामुळे बेरोजगार नागरिकांना उदरनिर्वाहाची चिंता सतत होती. मात्र शासनाने काही अटींवर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे सुरू करण्यास परवानगी दिली. त्यानुसार जिल्ह्यात या लॉकडाऊनच्या कालावधीत ९ हजार ८०९ मजूरांच्या हाताला काम मिळाले आहे.
सध्या जिल्ह्यात १८९६ कामे सुरू असून त्यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाच्या कामांचा वाटा मोठा आहे. बेरोजगारीमुळे होणारी फरफट लक्षात घेता शासनाने मनरेगाची कामे सुरू करून खूप मोठा दिलासा दिला आहे. मनरेगाची मजूरीही विनाविलंब आठवड्याला मजूरांच्या बँक खात्यात जमा होत असल्यामुळे त्याची चिंताही मिटली आहे. मनरेगातंर्गत एप्रिल २०२० पासून २३८ रूपये प्रति दिवस मजूरीचा दर निश्चित करण्यात आलेला आहे.
जिल्ह्यात मनरेगाचे कामावर कामाचे सप्ताह समाप्ती नंतर १५ दिवसाचे आत मजूरी प्रदान केली जाते. वेळेवर प्रदानाचे बाबत जिल्ह्याची टक्केवारी १०० टक्के असून सदर बाबतीत जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. मजूरी संबंधित मजूराचे बँक खात्यात प्रदान केल्या जाते. त्यामुळे मजूरीस विलंब लागत नाही. या योजनेतंर्गत सिंचन व जलसंधारण कामे प्राधान्याने करण्याबाबत केंद्र शासनाच्या सूचना आहेत. तसेच वैयक्तिक लाभाची कामे अंतर्गत विहीरी, फळबाग लागवड, गायी / शेळ्यांचा गोठा, शेततळे, रेशीम विकास कामे, शौचालये, शेतीची बांध बंधीस्ती व दुरूस्तीचे कामे केल्या जातात.
मजूरही शारिरीक अंतर व मास्क घालून काम करीत आहेत. चिखली तालुक्यातील बोरगाव वसू येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या रोपवाटीकेत काम करणाऱ्या मजूरांना मास्कचे वितरणही करण्यात आले आहे. लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसलेल्या मजूरांसाठी मनरेगा धावूनच आली आहे. या योजनेमुळे मजूरांना काम मिळून त्यांना मजूरीतून मिळणाऱ्या पैशामुळे उदरनिर्वाहाची चिंता मात्र मिटली आहे.