मांजरी – मागील तीन वर्षांपासून रेंगाळलेले मांजरी बुद्रुक रेल्वेगेट क्रमांक तीन येथील रेल्वे गेटवरील पादचारी भुयारी मार्गाचे काम मार्गी लागले आहे. रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून सात तासाचा ब्लॉक घेऊन गुरुवारी (दि . २७) या मार्गाचे काम करण्यात आले आहे. पुढील दोन दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. त्यानंतर बाकीचे उर्वरित काम करण्यासाठी तीन आठवडे लागणार आहेत. पुढील महिन्यात पादचाऱ्यांसाठी हा भुयारी मार्ग खुला होणार आहे. दरम्यान या भुयारी मार्गातून दुचाकीही सोडण्यात याव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
गुरुवारी सकाळी सात वाजल्यापासून भुयारी मार्गाचे काम सुरू करण्यात आले होते. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास मुख्य लोहमार्गाखालील मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले. पुढील दोन दिवसांत उर्वरित काम पूर्ण करण्यात येणार आहे.
यापूर्वी रेल्वेगेट कायमस्वरूपी बंद करताना हे काम करण्यासाठी रेल्वेकडून सहा तासांचा ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, कठीण दगड लागल्याने हे काम त्यावेळेत करता आले नव्हते. दररोज हजारो प्रवासी व स्थानिक नागरिक त्यामुळे जीव धोक्यात घालून लोहमार्गावरून प्रवास करीत आहेत. काल तीन वर्षांनी पुन्हा रेल्वे प्रशासनाने सात तासांचा ब्लॉक देऊन हे काम करण्यात आले. या पादचारी भुयारी मार्गामुळे आता नागरिकांना निर्धोक प्रवास करता येणार आहे.
याबाबत रेल्वे बांधकाम विभागाचे अभियंता राजेंद्र कुलकर्णी म्हणाले की, रेल्वे प्रशासनाकडून कालचा ब्लॉक मिळाल्यावर हे काम करण्यात आले आहे. हा पादचारी मार्ग छत्तीस मीटर लांबीचा आहे.तसेच सव्वा आठ फूट उंचीचा आहे. रुळाखालील काम पूर्ण झाले आहे. मात्र, आतील बाकीच्या कामासाठी तीन आठवड्याचा कालावधी लागू शकतो.त्यानंतरच हा भुयारी मार्ग पादचाऱ्यांसाठी सुरू होईल. कोणत्याही प्रकारच्या वाहनाला येथून प्रवास करता येणार नाही.
दरम्यान, हा मार्ग केवळ पादचाऱ्यांसाठी असल्याने स्थानिक रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. किमान दुचाकी वाहनांना येथून प्रवासासाठी हा मार्ग खुला ठेवण्याची मागणी त्यांनी केली आहे. स्थानिक नागरिकांनी या भुयारी मार्गाविषयी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
“मांजरी बुद्रुक रेल्वेगेटवरील भुयारी मार्ग ही एक नागरिकांची समजुत काढण्याचा प्रयत्न आहे.दुचाकी देखील जाऊ शकत नाही ? असा मार्ग तयार करण्यापेक्षा उड्डाणपुलाचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे.”
– शैलेंद्र बेल्हेकर(स्थानिक नागरिक)
“रेल्वेमार्गाची एकंदरीत आजची परिस्थिती पाहता मांजरी बुद्रुक गावाची एकूण लोकसंख्या आणि वर्दळ पाहता सदर भुयारी मार्गातून दुचाकी जाऊ देणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा या विरोधात तीव्र आंदोलन केले जाईल .पादचारी मार्ग सुद्धा चालू असावा आणि त्याच मार्गातून दुचाकीही जाण्यासाठी मार्ग असावा.”
-राजेंद्र साळवे(अध्यक्ष ,अखिल मांजराईनगर नागरीक कृती समिती)
“हा भुयारी मार्ग दुचाकीसाठी चालु करावा. जेणे करून नोकरदार वर्ग व शाळेच्या मुलांचे आज पर्यंत जे हाल झाले ते यानिमित्ताने थांबतील. जर तो फक्त पादचारी मार्ग असेल तर ही जनतेची दिशाभूल आहे.”
– अशोक आव्हाळे(स्थानिक नागरिक)