थेऊर, (वार्ताहर)- कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावरील कठडे प्रवाशांना धोकादायक ठरत असून कठड्यांना धडकून अपघात होत आहेत. येथील सततच्या अपघातात काहींना आपला जीव गमवावा लागला आहे, तर कित्येकांना गंभीर इजा झाल्याने अपंगत्व आले आहे. त्यामुळे येथील कठड्यावर पिवळा दिवा (ब्लिंकर्स) बसवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
उड्डाणपुलावर असलेले कठडे धोकादायक बनले असून रात्रीच्या वेळी हे कठडे दिसत नसल्याने वारंवार अपघात होत आहे. विशेषतः दुचाकी चालकांना समोरून येणार्या मोठ्या वाहनांची लाईट चमकल्याने कठडे दिसत नाही, त्यामुळे बहुतांशी अपघात होत आहेत. त्यामुळे थेऊरफाटा येथील रेल्वे उड्डाणपुलावरील कठडा मृत्युचा सापळा बनत चालला आहे.
अनेकदा स्वयंसेवी संस्था व राजकीय कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधिलकीतून अपघातग्रस्त कठड्याला रेडीअम व छोटे छोटे रेडिअमचे पोल कठड्यावर लावले होते. यामुळे दुचाकीवरून प्रवास करणा-यांना ते दिसत होते; मात्र काही महिन्यानतंरच ते गायब झाल्याने दुचाकीस्वारांचा प्रवास उड्डाणपुलावरुन सुरक्षित राहिलेला नाही.
आजच थेऊरफाटा येथील उड्डाणपूलावरील धोकादायक कठड्याची पाहणी करतो, तसेच ब्लिंकर्स दिवे किती लागतील व ते कुठे बसवावे याबाबत माहिती घेऊन सुरक्षित प्रवासासाठी प्राधान्य असल्याने उपाययोजनांची अंमलबजावणी केली जाईल. -कुमार घाडगे, पोलीस निरीक्षक वाहतूक शाखा