वडगाव मावळ,(प्रतिनिधी) – रल्वे फाटक ओलांडताना अपघात घडू नयेत, तसेच या भागात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वडगाव येथील रेल्वे फाटकाच्या जागेवर उड्डाणपुल उभारण्याचा रेल्वेचा मानस आहे. मात्र या पुलामुळे बाधित शेतकऱ्यांनी त्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.
या कामामध्ये कोणत्या शेतकऱ्याचे किती क्षेत्र जाईल? हे निश्चित करण्यासाठी आवश्यक क्षेत्राची प्रथम मोजणी करुन द्यावी, असा प्रस्ताव ‘महारेल’च्या अधिकाऱ्यांनी मांडला. त्याला संबंधित शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. त्यामुळे लवकरच या क्षेत्राची मोजणीची प्रक्रिया होणार आहे.
वडगाव येथील रेल्वे फाटकाच्या ठिकाणी नियोजित उड्डाणपुलामुळे बाधित शेतकऱ्यांची महारेलच्या अधिकाऱ्यां पंचमुखी मारुती मंदिराच्या प्रांगणात बैठक घेतली. या रेल्वे उड्डाण पुलामुळे आम्ही भूमीहिन होऊ, अशी भिती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. वडगावमधील या भागाची भविष्याची गरज लक्षात घेऊन येथे उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला.
उड्डाणपुलाच्या कामात रेल्वेच्या अलीकडे असणाऱ्या गावठाण विभागातील शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत. काही शेतकऱ्यांच्या जमिनीचे तुकडे होणार आहेत. त्यामुळे, सर्वच बाधित शेतकऱ्यांचा या उड्डाणपुलाला विरोध आहे. त्यामुळे, शासनाने या प्रकल्पाचा पुनर्विचार करावा व तो रद्द करावा, अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे.
उड्डाणपुलाचे नियोजन.
■ वडगाव येथील रेल्वे फाटक (क्रमांक ४९) काढून तेथे रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचे प्रस्तावित.
■ नियोजित उड्डाणपुलाची रुंदी १४ मीटर.
■ रस्त्याची रुंदी १०.५० मीटर तर एकूण लांबी ५५० मीटर.
■ उड्डाणपुलाच्या ठिकाणी छोटा भुयारी मार्गाचीही व्यवस्था.