मुंबई – ऑस्ट्रलियाच्या महिला क्रिकेट संघाविरुद्ध यजमान भारतीय महिला क्रिकेट संघाचा आज (शनिवार) दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाला ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. आता दुसरा सामना जकत मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी त्यांना क्षमतेपेक्षाही जास्त सरस खेळ करावा लागणार आहे.
पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघाने २८२ अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली होती. मात्र, तरीही गोलंदाजांना आलेल्या अपयशामुळे ऑस्ट्रेलियाने ४७ व्या षटकांतच सामना जिंकला व मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. पहिल्या सामन्यात स्टार फलंदाज स्मृती मानधना नसल्यानेही फलंदाजी कमकुवत ठरली होती.आता ती संघात परतल्याने संघाची ताकद वाढणार आहे.
तसेच कर्णधार हरमनप्रीत कौरलाही आपल्या कामगिरीबाबत आत्मपरिक्षण करावे लागणार आहे. या दोन देशांतील ३ एकदिवसीय सामन्यांची ही मालिका सुरु असून त्यापूर्वी झालेल्या एकमेव कसोटीत भारताच्या महिला संघाने एतिहासिक विजय मिळवला होता. मात्र, या पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय मालिकेत यशस्वी पुनरागमन केले. दुसरीकडे महिला संघाला मात्र, कसोटीतील सातत्य एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात दाखवता आले नाही. आता हा सामना जिंत मालिकेत बरोबरी करण्याची भारतीय संघाला संधी आहे. मात्र, पराभव पत्करावा लागला तर मालिकाही गमवावी लागणार आहे.