मुंबई – राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत आहे. अश्या परिस्थितीत राज्यातील सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध लावले जात आहेत. त्यामुळे ६८वी महिला राष्ट्रीय अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा पुढे ढकलण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर नवीन तारखा जाहीर केल्या जातील, असे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेच्या यजमानपदाखाली परभणी जिल्हा कबड्डी संघटना आणि परभणी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने १६ ते १८ जानेवारी महिला गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होणार होती. दोन दिवसांपूर्वीच क्रीडांगणांच्या तयारीला जोरदार प्रारंभ झाला होता. या स्पर्धेकरिता देशातील जवळपास ३० राज्यांचे संघ सहभागी होणार होते.
कोरोना परिस्थितीचा अंदाज घेऊन परिस्थिती पूर्वपदावर आल्यावर लवकरच स्पर्धेच्या नवीन तारखा जाहीर करण्यात येतील, असे राज्य कबड्डी संघटनेचे सरचिटणीस आस्वाद पाटील यांनी म्हटले आहे. भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या प्रशासकांनी स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटले आहे.