मद्रास – देशभरात सध्या करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याचे दावे करण्यात येत आहेत. करोनासंदर्भातील नवनवीन निष्कर्ष समोर येत असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांतील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे करोनाचा विस्फोट होण्याची शक्यता आहे.
फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या निवडणुकाच्या कालावधीतच देशात करोना संसर्गाची तिसरी लाट सर्वोच्च शिखर गाठण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आयआयटी मद्रासचे गणित विभागाचे सहाय्यक प्रोफेसर डॉ. जयंत झा यांनी या संदर्भात सूचक इशारा दिला आहे.
डॉ. जयंत झा म्हणाले की, पहिल्या आणि दुसऱ्या करोना लाटेपेक्षा तिसरी लाट वेगळी असून यात लसीकरण उपाय मानला जातोय. परंतु याआधी करण्यात आलेली टाळेबंदी आणि सोशल डिस्टन्सिंग हे उपाय आता दिसत नाही. डॉ. झा पुढे म्हणाले की, नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णाचा दर आर-शून्य नुसार सध्या चार एवढा आहे. याचा अर्थ करोना बाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ होत आहे. तर आर-शून्य दर एकच्या खाली आला तर त्याला महामारीचा शेवट मानला जातो. अर्थात आर-शून्य दरावरून ठरतं की, एक करोनाबाधित रुग्ण किती जणांना बाधित करू शकतो.
दरम्यान १५ फेब्रुवारी पर्यंत करोनाची तिसरी लाट ही सर्वोच्च शिखरावर असेल, असा अंदाजही झा यांनी व्यक्त केला. आयआयटी मद्रासच्या कम्प्यूटेशनल मॉडलिंगच्या निरीक्षणाच्या आधारावर मागील आठवड्यात (25 ते 31 डिसेंबर ) आर-शून्याचा राष्ट्रीय स्तरावरील दर 2.9 च्या जवळ होता. हाच दर १ जानेवारीनंतर ४ वर गेला आहे.
देशात मागील २४ तासांत १ लाख ४१ हजार ९८६ नवीन रुग्णाची नोंद झाली आहे. यावर प्रोफरसर डॉ. झा म्हणतात, की भारतातील आर-शून्यचा दर तीन गोष्टींवर अवलंबून आहे. व्हायरस प्रसरण्याचे प्रमाण, संपर्कात येण्याचा दर आणि साधारणतः किती अंतरावरुन हा व्हायरस पसरू शकतो. त्यांच्या नुसार जर टाळेबंदी किंवा सोशल डिस्टन्सिंग सारखे उपाय लागू केले गेले, तर आर-शून्यचा दर कमी होऊ शकतो. तसेच देशातील ५० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असून ही जमेची बाजू ठरू शकते, असंही त्यांनी नमूद केलं.