नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने आज देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 10 फेब्रुवारी पासून सात टप्प्यांमध्ये ही मतदान प्रकिया पार पडणार आहे. गोवा, उत्तराखंड आणि पंजाबात 14 फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार असून उत्तरप्रदेशात मात्र 10 फेब्रुवारीपासून सात टप्प्यात मतदान घेतले जाणार आहे.मणिपुर मध्ये 27 फेब्रुवारी आणि 3 मार्च या दोन टप्प्यात मतदान होणार आहे. या पाचही राज्यांची मतमोजणी एकाच दिवशी म्हणजे 10 मार्चला होणार आहे.
ज्या पाच राज्यांमध्ये ही निवडणूक होत आहे त्यातील चार राज्यांमध्ये भारतीय जनता पक्ष सत्तेवर आहे, त्यामुळे भाजपसाठी ही एक लिटमस टेस्ट असणार आहे. पंजाब या राज्यांत कॉंग्रेसचे सरकार सत्तेवर आहे. या पाच राज्यांत मिळून विधानसभेचे एकूण 690 मतदार संघ आहेत. त्यातील सर्वाधिक म्हणजे 403 मतदार संघ एकट्या उत्तरप्रदेशात आहेत. गोव्यात 40, मणिपुर मध्ये 60, उत्तराखंड मध्ये 70 आणि पंजाबात 117 मतदार संघ आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त सुशिल चंद्रा यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. ते म्हणाले की कोविडची तिसरी लाट देशात सुरू झाली असतानाही या निवडणूका घोषित कराव्या लागत आहेत कारण वेळवर निवडणुका घेणे हे लोकशाही प्रशासनातील अत्यंत महत्वाची बाब असल्याने त्याला आम्ही प्राधान्य द्यायचे ठरवले आहे. कोविडच्या संबंधात सर्व आवश्यक त्या दक्षता घेतल्या जाणार असून त्या संबंधात कडक निर्बंध आणि नियमावली जाहीर केली गेली आहे त्याच्या काटेकोर अंमलबजावणीकडे निवडणूक आयोगाचे पुर्ण लक्ष असणार आहे.
15 जानेवारी पर्यंत प्रत्यक्ष प्रचार बंद
निवडणूक आयोगाने केंद्रीय आरोग्य मंत्रालय, गृह विभागाचे सचिव तसेच विविध आरोग्य तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतरच निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले की, 15 जानेवारी पर्यंत निवडणुका होणाऱ्या राज्यांत कोणत्याही राजकीय पक्षांना प्रचारसभा, मेळावे, रोड शो घेण्यास अनुमती देण्यात येणार नाही. त्यानंतर प्रत्यक्ष कोविड स्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल. राजकीय पक्षांनी डिजीटल प्रचारावर भर द्यावा, डोर टू डोर प्रचार करावा, त्यासाठी केवळ पाचच जणांचे पथक घेऊन जावे अशा सुचना सर्व राजकीय पक्षांना करण्यात आल्या आहेत.
30 हजार मतदान केंद्रे वाढवली
कोविडची स्थिती लक्षात घेऊन मतदार केंद्रांवर गर्दी होऊ नये, मतदारांमध्ये सोशल डिस्टसिंग पाळले जावे यासाठी या पाच राज्यांतील मतदान केंद्राची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार त्या राज्यांमध्ये 30 हजार जादाची मतदान केंद्रे असणार आहेत. मतदान केंद्रांमधील ही वाढ 16 टक्के इतकी आहे. प्रत्यक्ष मतदान केंद्रांवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फेसमास्क सक्तीचा करण्यात आला असून तेथे सॅनिटायझेशनचीही व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदारांना कोविड लसींचे दोन्ही डोस दिले गेलेले असले पाहिजेत याचीही दक्षता घेतली जात आहे तसेच कर्मचाऱ्यांनाही दोन्ही डोस घेणे बंधनकारक असेल असेही मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले.
उत्तरप्रदेशातील मतदानेच टप्पे
10 फेब्रुवारी, 14 फेब्रवारी, 20 फेब्रुवारी, 23 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी, 3 मार्च आणि 7 मार्च
मणिपुरातील मतदानाचे टप्पे
27 फेब्रुवारी आणि 3 मार्च
पंजाब, उत्तरांचल आणि गोव्यातील मतदान
14 फेब्रुवारी