आबाराजे मांढरे पाटील यांच्या राजकीय कारकीर्दीमध्ये त्यांना उपसरपंचपदाचा मान मिळाला. त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य पदाच्या निवडणूकीची संधी कुसुम (जिल्हा परिषद सदस्या, पुणे, शिक्रापूर-सणसवाडी गट) ताईंना मिळाली आणि त्यांनी या संधीचे सोने केले. ऐन निवडणूकीमध्ये जोरदार प्रतिस्पर्धी असताना कुसुमताईंनी मिळविलेला विजय हा त्यांच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. निवडून आल्यानंतर कुसुमताईंनी बचत गटासह अनेक लोक विकासाची कामे करून आपला ठसा उमटवला. या कार्यांमध्ये त्यांना चांगले यश मिळाले तसेच गतवर्षी आलेल्या करोना महामारीच्या साथीमध्ये त्यांनी केलेल्या कामाचे कौतुक खुद्द विद्यमान आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. कुसुमताईंच्या कार्यावर एक दृष्टीक्षेप महिला दिनाच्या निमित्ताने….
शिक्रापूर येथील थोरात कुटुंबात 16 जून 1990 रोजी कुसुमताई मांढरे पाटील यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती जेमतेम होती. त्यांनी आपल्या दोन भावंडांसमवेत शिक्षण घेतले. त्यांचे वडील मारुती थोरात यांनी त्यांच्यावर उत्तम संस्कार केले. पुढे जाऊन कुसुमताई यांचा विवाह शिक्रापूर येथील उद्योजक म्हणून ओळखले जाणारे आबाराजे मांढरे यांच्या सोबत झाला यावेळी आबाराजे यांचे वडील शिक्षक असल्याने घरात शांतता व शिस्तिचे वातावरण यावेळी मांढरे कुटुंबामध्ये सामावून जात त्यांनी आपल्या संसाराचा गाडा हाकण्यास सुरवात केली.
पुढे जाऊन कुसुमताई यांचे पती आबाराजे मांढरे राजकारणात सक्रीय झाले आणि ग्रामपंचायत निवडणूक लढवीत ते शिक्रापूरच्या उपसरपंचपदी विराजमान झाले. यावेळी कुसुमताईंनी आपल्या पतीला साथ देण्याचे काम करत गावातील सर्व सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग घेतला. कुसुमताईंनी अनेक महिलांचे संघटन करत महिलांना बचत गटाच्या माध्यमातून मदत करत महिलांना स्वावलंबी बनविण्याचे काम केले.
दरम्यानच्या काळात जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाली अन अचानक शिक्रापूर सणसवाडी गटातून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून कुसुमताई मांढरे पाटील यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी जाहीर झाली. यावेळी सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना अनेकांनी त्यांच्या विरोधात शड्डू ठोकले. परंतु कुसुम मांढरे या मोठ्या मताधिक्क्याने निवडून येत जिल्हा परिषदेच्या सदस्या झाल्या. त्यानंतर काही दिवसातच त्यांची जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी देखील वर्णी लागली. त्यांनतर त्यांनी आपल्या भागाचा विकास हेच ध्येय डोळ्यासमोर ठेवत अनेक विकासकामे मार्गी लावली.
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपल्या जिल्हा परिषद गटातील गरजूंना असंख्य योजनांची माहिती देत त्याचा लाभ देखील मिळवून दिला, या काळामध्ये त्यांनी या भागातील औद्योगिक परिसरातील मोठमोठ्या कंपन्यांना भेटी देत कंपनीच्या सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) फंडातील निधीच्या माध्यमातून देखील जिल्हा परिषद गटातील विकास कामांना हातभार लावला आहे. कुसुमताई मांढरे यांच्या कार्याबद्दल महाराष्ट्राचे विद्यमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील कित्येकदा कौतुक केले आहे. आपल्या परिसरात त्यांनी महिलांसाठी अनेक उपक्रम राबवीत, समाजपयोगी अनेक उपक्रम देखील राबविले आहेत.
अलीकडील काळामध्ये सर्वत्र हाहाकार माजविलेला कोरोना या रोगाने 22 मार्च 2020 रोजी शिक्रापूर येथे हजेरी लावली आणि शिक्रापूर येथीलच एका सोनोग्राफी सेंटर डॉक्टरसह परिसरातील तब्बल 142 महिलांना त्याचा धसका घ्यावा लागला. यावेळी कुसुमताईंनी शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्यासह राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यापर्यंत वेळोवेळी योग्य माहिती पोहचवली आणि सर्व महिलांसह त्यांच्या कुटुंबियांना मोठा धीर देत त्यांना त्यातून बाहेर काढण्याचे काम केले. सध्या कोणत्याही कुटुंबाला काही अडचण निर्माण झाल्यास ते कुसुमताई यांना आर्वजून हाक मारतात, हेच त्यांच्या यशाचे आणि लोकप्रियतेचे द्योतक आहे.
करोना काळातील उल्लेखनिय कार्य…
कोरोना लॉकडाऊनच्या काळामध्ये जीवाची बाजी लावणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना विशेष मदत देत त्यांचा सन्मान करून त्यांना त्यांच्या कार्यास प्रेरणा देण्याचे काम देखील त्यांनी केले आहे. तसेच लॉकडाऊनच्या काळामध्ये जिल्हा परिषद गटातील सर्व गरजू कुटुंबियांच्या घरी जाऊन त्यांना किराणा सह त्यांच्या गरजेच्या वस्तू देण्याचे काम तर केलेच मात्र परप्रांतीय मजुरांना जेवणाची तसेच काहींना त्यांच्या गावी पोहचविण्याची देखील जबाबदारी त्यांनी घेतली यावेळी अनेकांनी कुसुमताई म्हणजे देवदूतच असल्याचा आदराने उल्लेख केला आहे.
शब्दांकन : श्री. मयुर करंजे पाटील