आयपीएल स्पर्धेत महिलांचीही स्पर्धा घेण्यात आली. त्यात स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील ट्रेलब्लेझर्स संघाने विजेतेपद मिळवले. खरेतर या स्पर्धेला स्पर्धा म्हणावे का, हाच मोठा प्रश्न आहे. कारण तीन संघांत झालेले तीन सामने व त्यातून सर्वाधिक गुण असलेल्या दोन संघात अंतिम सामना पार पडला. हे म्हणजे लग्नात मुंज उरकणे हाच प्रकार होता.
अर्थात तरीही या स्पर्धेतील सामन्यांना थेट प्रक्षेपणात प्रेक्षकवर्ग मिळाला हे देखील महत्त्वाचे. स्पर्धेला काही प्रायोजकही मिळाले, आता प्रेरणा देखील मिळावी हीच काय ती अपेक्षा. काही वर्षांपूर्वी महिलांचे क्रिकेट म्हणजे पोरखेळ समजला जात होता. याच खेळात भारतीय महिला संघाने यशाचे इमले रचले. कित्येक वर्षांनी बीसीसीआयनेही महिलांच्या क्रिकेटला आपल्या कक्षेत घेतले व तेव्हाच महिला क्रिकेटच्या प्रगतीचा प्रवास सुरू झाला. आता येत्या काळात या महिलांच्या आयपीएलचे पूर्ण रूप दिसावे. संघांची तसेच सामन्यांची संख्याही वाढलेली दिसावी.
वासरात लंगडी गाय शहाणी असे चित्र बदललेले दिसावे. तीन संघात होणारी स्पर्धा काय यश देणार? एकीकडे बांगलादेश, श्रीलंका, पाकिस्तान यांनी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे संघ सातत्याने नवनवे खेळाडू जागतिक क्रिकेटला देत आहेत. इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडिज यांच्या महिला संघाचा खेळ पाहिला तर असे वाटते की, आपले खेळाडू असे वर्चस्व कधी निर्माण करणार? यंदाच्या महिलांच्या चॅलेंजर स्पर्धेतील सामन्यांत झालेला खेळ पाहिला की असे लक्षात येते, काही खेळाडूंना आपण नक्की क्रिकेटच खेळत आहोत ना, अशी शंका येते.
भारतीय खेळाडूंबाबत बोलायचे झाले, तर स्मृती मानधनाची कामगिरी आंतरराष्ट्रीय दर्जाची वाटते. काहीचे क्लब क्रिकेट खेळत असल्याचा भास होत होता. हे चित्र बदललेले दिसावे असे वाटत असेल तर या स्पर्धेची व्याप्ती वाढावी तरच येत्या काळात अशा अनेक स्मृती मानधना भारताच्या महिला संघाला मिळतील.