प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 27 – प्रत्येक क्षेत्राबरोबर राजकारणात महिलांचे स्थान दिसू लागले. खऱ्या अर्थाने समाजाची मानसिकता बदलण्याचे काम महिला करू शकतात, असे मत खासदार ऍड. वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटतर्फे चौथ्या आदर्श माता पुरस्कार खासदार राजू शेट्टी यांच्या मातोश्री रत्नाबाई शेट्टी, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई मोहोळ, पिंपरी चिंचवड शहर पोलीस उपायुक्त मंचक इप्पर यांच्या मातोश्री रुक्मिणीबाई इप्पर यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पिंपरी चिंचवड शहर पोलीस उपायुक्त मंचक इप्पर, ज्ञानोबा इप्पर, प्रभाकर मोहोळ, सौरभ शेट्टी, संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष ऍड.शार्दुल जाधवर, खजिनदार सुरेखा जाधवर आदी उपस्थित होते.
पुरस्काराला उत्तर देताना रत्नाबाई शेट्टी म्हणाल्या, “मी नऊ मुलांची आई आहे. मी मुलांना वाढवले, शिकवले, मोठे केले. मूल आईच्या काळजाचा तुकडा असतो. त्यामुळे आईला कधी दुखवायचे नसते.’
रुक्मिणीबाई मोहोळ म्हणाल्या, “आम्ही वाड्यात रहात होतो, तेव्हा लोक म्हणायचे आई वडील शिकलेले नाहीत तरी मुले पहिल्या नंबरने कशी पास होतात. मुले शाळेत हुशार होती. मुलाला जसे राजकारणाच वेड लागले, तेव्हापासून तो समाजासाठी काम करतो आहे. जेव्हा त्याचे काम बघते तेव्हा माझ्या डोळ्यांत अभिमानाने अश्रू येतात.’
रुक्मिणीबाई इप्पर यांनी देखील मंचक इप्पर यांच्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्याबद्दलचा अभिमान व्यक्त केला. यावेळी शहरातील विविध क्षेत्रांतील नामवंत उपस्थित होते.