बदल ही एक न थांबणारी व न संपणारी प्रक्रिया आहे. आपणही आपल्यात काही सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी “गुणग्राहकता’ हवी, अशी गुणग्राहकता कशी वाढवावी? नेमके याच विषयी थोडेसे…
आपण कोणीच परिपूर्ण नाही हे आपल्याला माहीतच आहे. पण याचा अर्थ असा नाही की, आपण आपल्यात काही बदल घडवून आणावयाचेच नाही. आपल्यात काही सुधारणा करावयाच्याच नाही. आपण स्वतःमध्ये सतत सुधारणा घडवित राहायचे आहे. आपण परिपूर्ण होण्याचा प्रयत्न तर करू शकतो. आपण आयुष्यभर विद्यार्थीच राहिले पाहिजे ते आपल्या स्वतःच्या फायद्यासाठीच. आपण जर सतत शिकण्याची तयारी ठेवली, तर बरेच काही शिकू शकतो. आपल्यात सुधारणा घडवून आणण्यासाठी, तसेच आपल्यातील कौशल्य वाढविण्यासाठी शाळेच्या चार भिंतीत बसून ते शक्य नाही. यासाठी आपण सतत सभोवतालच्या परिस्थितीचे, व्यक्तींचे निरीक्षण करीत राहिले पाहिजे. संवाद साधला पाहिजे. अशाने आपण अंशतः का होईना परिपूर्णतेच्या दिशेने पुढे जातो.
दत्त गुरूंनी चोवीस गुरू केले होते. त्या प्रत्येकाकडून बरेच काही ज्ञान त्यांनी प्राप्त करून घेतले. आपल्या सभोवती बऱ्याच व्यक्ती असतात. त्या व्यक्ती कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात निपूण असतात. कोणी पाककलेत, कोणी क्रीडा क्षेत्रात निपूण असेल. अशा व्यक्तींकडून आपण बरीच माहिती घेऊ शकतो, बरेच ज्ञान घेऊ शकतो. अशी अनंत क्षेत्र आहेत, सर्वच क्षेत्रात आपल्याला काही करता येईल असे नाही. पण थोड्याफार क्षेत्रातील ज्ञान आपल्याकडे असेल, तर आपण आपल्या जीवनात काही उपयोग करून घेऊ शकतो. आपल्या सभोवती जी माणसे असतात त्यांच्याकडून शिकण्यासारखे काही असते, फक्त आपण त्या दृष्टीने त्यांच्याकडे पाहायला हवे. त्यांच्याशी संवाद साधायला हवा. जेव्हा त्यांच्याशी संवाद साधू त्यावेळी ती व्यक्तीसुद्धा चांगले मार्गदर्शन करू शकते, माहिती देऊ शकते. एकदा असेच माझी आई जिलेबी करीत होती.
मी तिथेच उभा राहून गरमा-गरम जिलेबीवर ताव मारत होतो. माझ्या असे लक्षात आले की, आई दोन वेगवेगळे झारे वापरत आहे. एक तळण्यासाठी, तर दुसरा तळलेली जिलेबी पाकात टाकण्यासाठी व काढण्यासाठी. मी सहजच आईला विचारले, “”हे दोन झारे कशाला वापरतेस? जर एकाने काम होत असेल तर दोन कशासाठी वापरायचे?” आईने सांगितले, “”तळण्यासाठी व पाकात बुडविण्यासाठी एकच झारा वापरला तर जिलेबी बिघडते.” आईचे हे वाक्य अनुभवांती आलेले होते. म्हणजेच याआधी एकच झारा वापरण्याचा प्रयोग आईचा झालेला होता आणि समस्या पण निर्माण झालेली होती. त्या समस्येवर उपायही आईने शोधून काढलेला होता. भविष्यात जर मी जिलेबी करू लागलोच तर मी झाऱ्यामुळे जिलेबी बिघडू देणार नाही. कारण आईकडून आयतीच तयार माहिती मजला मिळालेली आहे. मी कशाला चुकीचा प्रयोग करून पाहू? पण हेच जर मी आईला “दोन झारे कशाला वापरतेस?’ हे विचारलेच नसते व फक्त खाण्यावर लक्ष केंद्रित केले असते, तर मला वरील माहिती मिळालीच नसती. अशाच प्रकारे आपल्याला काही महत्त्वाचे अनुभवाचे बोल ऐकायला मिळाले, तर आपण चांगली कामगिरी करू शकतो.
आपल्याकडे जर दुसऱ्या क्षेत्रातील कौशल्य असेल तर ते आपल्या क्षेत्रात आपण चांगल्या प्रकारे वापरू शकतो. चंदू बोर्डे इंग्लंडमध्ये खेळत होते. त्यांनी इंग्लंडच्या एका क्षेत्ररक्षकाकडे चेंडू सरकवला व एक चोरटी धाव घेण्यासाठी दुसऱ्या टोकाकडे धावले. त्यांचा होरा असा की तो क्षेत्ररक्षक लांबून धावत येणार, चेंडू उचलणार आणि मग फेकणार, तोपर्यंत आपण सहज दुसऱ्या टोकाला पोहोचू. पण असे झाले नाही. त्या क्षेत्ररक्षकाने चेंडू उचलला नाही तर तो पायाने लाथाडला आणि यष्ट्यांकडे सरकविला.
तो चेंडू चंदू बोर्डे दुसऱ्या टोकाला पोहोचायच्या आत यष्ट्या भेदून विसावलेला होता. जेव्हा चंदू बोर्डे बाद झाले त्याचवेळी त्यांच्या लक्षात आले की, “हा खेळाडू केवळ क्रिकेटच नाही तर फुटबॉलसुद्धा खेळतो.’ त्या क्षेत्ररक्षकाने त्याचे फुटबॉलमधील कौशल्य क्रिकेटमध्ये वापरून कार्यभाग साधला होता. आपणही अशाच प्रकारे आपली कामगिरी उंचावू शकतो, त्यासाठी आपल्यामध्ये पात्रता हवी. आपली पात्रता वाढविण्यासाठी विविध गुण-कौशल्ये आपल्यात असणे आवश्यक असते. त्यासाठी आपण गुणग्राहकता दाखविणे आवश्यक असते. आपण जर इतर गुण-कौशल्यांकडे दुर्लक्ष केले तर आपणच आपल्यावर मर्यादा घालू असतो.
संगीतकार अन्नू मलिक यांनी “सोनी महिवाल’ (1984) या चित्रपटासाठी संगीत दिले. चित्रीकरणासाठी गाणे तयार करून हवे असल्याने त्यांनी अनुपमा देशपांडे यांच्याकडून “सोनी चिनाब दे किनारे’ हे गाणे गाऊन घेतले. अन्नू मलिक यांनी आशा भोसले यांना तेच गाणे ऐकवून त्यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित करण्याची विषयी सांगितले. जेव्हा आशा भोसले यांनी ते गाणे ऐकले तेव्हा त्या म्हणाल्या, “अनुपमा देशपांडे यांनी गाणे चांगले गायलेले आहे. त्यामुळे चित्रपटात तसेच ठेवा.’ अनुपमा देशपांडे यांना त्या गाण्यासाठी 1985 सालच्या 32 व्या फिल्म फेअर पुरस्कार समारंभात सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला. यावरून आपण एक लक्षात घ्यावे की, रत्नपारखीच रत्नाची खरी पारख करू शकतो. एक गुणी माणूसच दुसऱ्या गुणी माणसाची कदर करू शकतो.
साधु ऐसा चाहिए, जैसा सूप सुभाय,
सार सार को गहि रहे, थोथा देय उडाय। कबीर
(स्थूलार्थ : या जगात धान्य साफ करणाऱ्या सुपासारख्या सज्जनांची आवश्यकता आहे, की जो चांगले तेच स्वतः जवळ ठेवतो आणि वाईट ते सोडून देतो. सूप जसे धान्यच शिल्लक ठेवतो आणि कचरा फेकून देतो अगदी तसेच.)
प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले-वाईट गुण असतातच. त्यातील आपण फक्त चांगलेच गुण घ्यावयाचे आहेत. वाईट गुण उचलायचे नाही. आपल्यातील काही वाईट गुण असतील तर तेही संपवायचे आहेत. कबिराने दोहा सांगितल्याप्रमाणे वाईट गुणांचा थोथा आपल्यातून उडवून लावायचा आहे. प्रत्येक वेळी आपल्याला कोणीतरी अगदी बोटाला धरून शिकवेल हे शक्य नाही. आपणच आपली चौकसबुद्धी जागृत ठेवून गुणग्राहकता वाढवायला हवी. काही दिवसांनी असा चौकसपणा हा इतका अंगवळणी पडेल की, आपल्याला विशेष काही प्रयत्नही करावे लागणार नाही.
आपण आपल्या मनमंदिराच्या गाभाऱ्यात बसून आपल्या मनोदेवतेला “सतत काही नवीन ते शिकण्याची इच्छा जागृत राहावी.’ ही इच्छा बोलून दाखविली तर आपली मनोदेवता आपली इच्छा नक्कीच पूर्ण करेल यात शंकाच नाही.
– अनिकेत भालेराव