रिऑसिटी किल्ड द कॅट’ अशी इंग्रजीत एक म्हण आहे. त्याचा अर्थ असा की, जिथे धोका संभवतो तिथे नाक खुपसू नये. आपल्याकडेही “माकड आणि पाचर’ ही कथा सुप्रसिद्ध आहे. माकड कुतूहलामुळे सुतार ज्याप्रमाणे पाचर काढून पुढे लाकूड कापतो तसे करण्यासाठी पाचर काढतं आणि त्यात त्याची शेपटी अडकून ते जायबंदी होतं. हे जरी काही प्रमाणात खरं असलं तरी कुतुहलामुळेच मानव आज प्रगतीपथावरील अतिशय उच्च स्थानी पोचला आहे, हे नाकारता येणार नाही. कुतूहलामुळे अगदी प्राचीन काळापासून तो विविध प्रयोग करीत गेला आणि त्यातून शिकत गेला- त्याला प्रगतीचा मार्ग खुणावत गेला.
फार, फार प्राचीन काळी रानटी मनुष्याला वादळामध्ये झाडांचे बुंधे एकमेकांवर घासताना अग्नी निर्माण झाल्याचं दिसलं. कुतूहलपूर्वक त्यानं दोन लाकडं एकमेकांवर घासून पाहिली आणि अग्नी निर्माण झाला. कुतूहलामुळेच बीजामधून वनस्पतींची पुनरुत्पत्ती होते हे त्याला अभ्यासातून लक्षात आले आणि पुढे कृषिविद्येचा जन्म झाला.
उत्क्रांतीमध्ये कुतूहलाचा मोठा वाटा आहे. मात्र मानवी संस्कृती काहीशी स्थिरावल्यावर एक प्रकारचं शैथिल्य आलं आणि कुतूहल मागे पडलं. मध्ययुगीन काळात कुतूहलानं पुन्हा एकदा उभारी घेतली आणि निसर्गातील गोष्टींचा रीतसर अभ्यास सुरू झाला. यालाच विद्येचं पुनरुज्जीवन (रेनासांस) असं म्हणतात. केवळ धर्मगुरूंच्या विधानावर विश्वास न ठेवता त्यातील तथ्य अभ्यासण्यासाठी गॅलिलिओसारख्या शास्त्रज्ञांनी अवकाशनिरीक्षण करून आपली मतं ठामपणे मांडली. कोपर्निकसनं परमात्म्याची लाडकी पृथ्वी ही दृश्य अवकाशाचा केंद्रबिंदू नसून खरा केंद्रबिंदू सूर्य हा आहे, असं सिद्ध केलं. यामुळे सत्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अभ्यास सुरू झाला.
गमतीची गोष्ट अशी की कुतूहलापोटी केप्लर या जर्मन खगोलवैज्ञानिकानं रोजच्या रोज रात्री गच्चीवर जाऊन ग्रहांची स्थानं नोंदण्यास सुरुवात केली. अनेक वर्षे असा अभ्यास करून त्यानं ग्रहांच्या स्थितींचं आणि त्यामुळे व्यक्त होणाऱ्या त्यांच्या गतीचं कोष्टक मांडलं. या अभ्यासातून त्यानं ग्रहांच्या भ्रमणाविषयीचे 3 सिद्धांत जगाला दिले. आजही परग्रहावरील मोहिमा आखताना केप्लरनं 400 वर्षांपूर्वी दिलेल्या या तीन सिद्धांतांचाच उपयोग केला जातो. एका कुतूहलापायी खगोल आणि अंतराळविज्ञानाचा केवढा मोठा पाया रचला गेला ते पाहा. या तत्त्वांचा परिणाम एवढ्यावरच थांबला नाही तर पुढे आयझॅक न्यूटननं केप्लरच्या विचारांचं मूळ घेऊन आपला अतिशय महत्त्वाचा गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत बांधला.
कुतूहलामुळे नुकसानही होऊ शकतं आणि फायदाही. याचाच अर्थ कुतूहल हे एक दुधारी शस्त्र आहे. कुतूहल जागृत झाल्यावर काळजीपूर्वक अभ्यास केला, तर नुकसान न होता अभ्यासातून ज्ञानप्राप्ती होते आणि नवीन कल्पना मांडता येतात.
माझा स्वत:चा अनुभव खूप बोलका आहे. आमच्या घराचं बांधकाम चालू होतं. काही गवंड्यांनी कोनाड्याला गिलावा केला आणि काम संपवून ते निघून गेले. मला गिलावा केलेला गुळगुळीत पृष्ठभाग खूप आवडला आणि त्यावरून आनंदानं हात फिरवताच त्यातील काही भाग खाली पडला. याउपर मी जवळच्या घमेल्यातील गिलाव्याचा कालवलेला माल घेऊन तो ढासळलेल्या भागावर लिंपण्याचा प्रयत्न केला. झालं भलतंच! सगळा कोनाडा खराब झाला. गवंड्यांना दुसरे दिवशी सगळं काम पुन्हा करावं लागलं आणि मला वडिलांकडून मार खावा लागला होता!
कुतूहल, निरीक्षण आणि अभ्यास यांचा मात्र मला खूप उपयोग झाला, हेही इथे सांगितलं पाहिजे. माझ्या लक्षात असं आलं आहे की, जे लोक घोकंपट्टी करून शिकतात त्यांचं ज्ञान वरवरचं राहतं. पण कुतूहलामुळे जे पाठपुरावा करून निरीक्षण आणि अभ्यास करतात त्यांना निश्चित उपयोग होतो. काचेतून प्रकाश आरपार जातो; पण लाकडातून का जात नाही याचं उत्तर अनेकांनी तो लाकडात शोषला जातो असं बरोबर दिलं. परंतु शोषला जातो म्हणजे नक्की काय होतं ते विचारल्यावर गाडी तिथेच थांबली. पदार्थांची नैसर्गिक स्पंदनसंख्या आणि प्रकाशतरंगांची स्पंदनसंख्या जुळली की लाकडातील पदार्थकण स्पंदन करू लागतात आणि त्यामुळे रेणूंचं घर्षण होऊन पदार्थ तापतो. म्हणजेच प्रकाश शोषला जाऊन लाकडातून आरपार जात नाही हे समजल्यावर विद्यार्थ्यांचं कुतूहल जागृत झालं.
– श्रीनिवास शारंगपाणी