पार्वती कृष्णन या स्वातंत्र्यानंतरच्या देशातील साम्यवादी आंदोलनाचा प्रमुख चेहरा होत्या. त्यांची ओळख एक मोठ्या कामगार नेत्या म्हणून होती. तामिळनाडूमध्ये एका अत्यंत श्रीमंत कुटुंबात जन्मलेल्या पार्वती कृष्णन यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून शिक्षण घेतले होते. मात्र त्यानंतर राजेशाही थाट आणि आलिशान ऐशोआरामातील आयुष्याचा त्याग करुन त्या गरीब आणि कामगारांच्या समस्यांशी एकरुप झाल्या. त्यांचे वडील मद्रास राज्याचे प्रधानमंत्री होते. ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकत असतानाच त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव पडला.
पार्वती यांनी 1957 मध्ये म्हणजे दुसऱ्या लोकसभेसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये कम्युनिस्ट पक्षाकडून तमिळनाडूतील कोईमतूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि त्या विजयीही झाल्या होत्या. 1974 मध्ये कोईमतूरमधील पोटनिवडणुकीत त्या विजयी झाल्या. पुढे 1977 मध्ये पुन्हा एकदा लोकसभेसाठी त्या निवडून गेल्या. याखेरीज एकदा त्यांची राज्यसभेसाठीही निवड करण्यात आली होती. तथापि, 1952 च्या पोटनिवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झाला होता. तसेच 1962, 1980 आणि 1984 च्या लोकसभा निवडणुकांमध्येही त्या रिंगणात उतरल्या; पण विजयी होऊ शकल्या नाहीत.
जनता पक्षाच्या सरकारच्या काळात मोरारजी देसाई पंतप्रधान होते, तेव्हा त्यांनी संसदेमध्ये महिलांसंदर्भात अशोभनीय टिप्पणी केली होती. पार्वती कृष्णन यांनी तत्काळ त्यावर आक्षेप घेत जोरदार विरोध केला. यानंतर मोरारजी देसाईंना माफी मागावी लागली होती.पार्वती कृष्णन यांच्या वडिलांची 500 एकर जमीन होती. वडिलांच्या पश्चात पार्वतींनी ती भूमीहिनांना दान दिली.