चेन्नई – माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एन.शेषन यांचे आज राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते. माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस.वाय.कुरेशी यांनी ट्विटरवरील पोस्टच्या माध्यमातून शेषन यांच्या निधनाचे वृत्त दिले आहे.
चंद्रशेखर सरकारमध्ये मंत्री असलेल्या सुब्रह्मण्यम स्वामी यांचा 1990 सालचा हा किस्सा. यावर्षीच्या डिसेंबर महिन्या- मध्ये एके रात्री अचानक नियोजन आयोगाचे सदस्य असलेल्या टी. एन. शेषन यांच्या घरी स्वामी पोहोचले. शेषन यांना त्यांनी विचारले की, तुम्हाला भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त बनवलेले आवडेल का? रात्री एक वाजता मिळालेल्या या प्रस्तावामुळे शेषन फारसे उत्साहित नव्हते. याचे कारण स्वामींनी विचारणा करण्याच्या एक दिवस आधी कॅबिनेट सचिव विनोद पांडे यांनीही त्यांना अशाच प्रकारचा प्रश्न विचारला होता.
“शेषन- ऍन इंटिमेट स्टोरी’ हे पुस्तक लिहिणाऱ्या गोविंदन कुट्टी या पत्रकारांनी या आठवणी नोंद केल्या आहेत. ते म्हणतात, सुब्रह्मण्यम स्वामी घरातून गेल्यानंतर शेषन यांनी राजीव गांधींची भेट घेतली. राजीव गांधींनी आवाज दिला, “फॅट मॅन इज हिअर. क्या आप हमारे लिये कुछ चॉकलेटस् भिजवा सकते है’।
राजीव गांधी आणि शेषन या दोघांचाही चॉकलेट हा वीक पॉईंट होता. राजीव गांधींनी शेषन यांना मुख्य निवडणूक आयुक्त पद स्वीकारण्यास सहमती दर्शवली. राजीव गांधींच्या कार्यकाळात शेषन हे अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाचे सचिव राहिलेले होते. एकदा त्यांनी राजीव गांधींच्या तोंडातून बिस्कीट काढून घेतले होते. पंतप्रधानपदी बसलेल्या व्यक्तीने परीक्षण न झालेला कोणताही पदार्थ असा सहज खाता कामा नये, असे शेषन यांनी त्यावेळी म्हटले होते.