कोल्हापूर/ प्रतिनिधी- महिलांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाला वेगळी दिशा देणारे उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान आता बाह्य संस्थेकडे वर्ग करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्यामुळे या अभियानाला जोडलेल्या राज्यातील लाखो महिलांचा जीवन उन्नतीचा मार्ग आणखी खडतर झाला आहे.
शासनाकडून मिळणारा निधी ठप्प झाला असून संस्था मोडकळीस येण्याची भीती निर्माण झाली असल्याने महिलांच्या संस्था वाचवून महिलांना मार्गदर्शन करणारे हे अभियान निरंतर सुरू राहावे आणि बाह्य संस्थेचा हस्तक्षेप होऊ नये या मागणीसाठी राज्यभरातील लाखो महिलांनी आज यल्गार पुकारला आहे.
याचाच भाग म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदच्या दीडशेपेक्षा अधिक महिलांनी मूक मोर्चा काढून आपले निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केला आहे. यावेळी राज्य सरकारने खासगीकरण केल्यास उमेद अभियानचे वाटोळे होणार असून बाह्य संस्थांचा हस्तक्षेप त्वरित थांबवावा अशी मागणी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आली आहे.