Women Asia Cup – आशिया चषक २०२२ च्या १३ व्या सामन्यात पाकिस्तानने भारताचा १३ धावांनी पराभव केला आहे. पाकिस्तानने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर १३८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र प्रत्युत्तरात भारताचा संपूर्ण संघ केवळ १२४ धावा करून बाद झाला. या सामन्यात पाकिस्तानच्या निदा दारने अष्टपैलू कामगिरी केली. फलंदाजी करताना अर्धशतकी खेळी खेळली. त्यानंतर गोलंदाजीत २ महत्वपूर्ण बळी घेण्यात तिने यश मिळवले.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने ६ गडी गमावून १३७ धावा केल्या होत्या. १३८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली. अवघ्या २३ धावांच्या स्कोअरवर भारताचा पहिला गडी बाद झाला. यानंतर भारतीय संघाचे ठराविक अंतराने गडी बाद झाले. भारतीय संघाकडून कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. त्यामुळे भारताला हा सामना १३ धावांनी गमवावा लागला.
सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तान संघाची सुरुवात खराब झाली होती. संघाने ३३ धावांच्या स्कोअरवर ३ गडी गमावले होते. मात्र यांनतर पाकिस्तानच्या बिस्माह मरुफ ( ३२ धावा ) आणि निदा दार ( ५६ धावा ) यांनी फलंदाजीच्या पडझडीला थांबवले. त्यामुळे पाकिस्तान संघाने सामन्यात सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारली. पाकिस्तानची अष्टपैलू खेळाडू निदा दार हिने फलंदाजी आणि गोलंदाजीत दमदार कामगिरी केली.
After losing to Thailand 24 hours ago, Pakistan have turned it around and how!
They’ve registered their THIRD win vs India in women’s T20Is, and their first victory over them in the Asia Cup 😮 #INDvPAK #AsiaCup2022
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 7, 2022
महिला आशिया चषक स्पर्धेतील ( Women Asia Cup ) सुरुवातीचे तीन सामने जिंकल्यानंतर चौथ्या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला आहे. संघाचा पुढील सामना ८ ऑक्टोबर रोजी बांगलादेश विरुध्द होणार आहे. त्यानंतर १० ऑक्टोबर रोजी भारतीय संघ थायलंडला टक्कर देईल. आशिया चषकच्या गुणतालिकेत भारतीय संघ सध्या पहिल्या स्थानावर विराजमान आहे. मात्र संघाला आजच्या पराभवातून बऱ्याच गोष्टींमध्ये सुधार आणावा लागणार आहे.