IND vs PAK T20 WorldCup 2022 – पाकिस्तानविरुद्ध भारताचा सामना आणि विराट कोहली फलंदाजी हे समीकरण गेल्या अनेक वर्षांपासून चालत आले आहे. विराटने नेहमीच पाकिस्तानविरुद्ध भारताच्या विजयात नेहमीच मोठा वाट उचलला आहे. काल मेलबर्नमध्ये झालेल्या सामन्यात विराटने पुन्हा एकदा इतिहासाला वेगळी ओळख दिली. कोहलीने पाकिस्तानविरुद्ध सामन्यात नाबाद ८२ धावांची खेळी करून भारताला मोठा विजय मिळवून दिला. सामन्यानंतर पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम देखील विराट कोहलीच्या फलंदाजीचा चाहता बनला आहे.
सामन्यानंतर बाबर आझमने विराट कोहलीच्या फलनदाजीचे तोंड भरून कौतुक केले. बाबर म्हणाला की, “भारत-पाकिस्तान सामन्यात नेहमीच खेळाडूंवर मोठे दडपण असते. त्यामुळे तुम्ही ते शक्य तितके बाजूला ठेवायला हवे. सामन्याचे दडपण विराट कोहलीने स्वतःवर येऊ दिले नाही. म्हणूनच तो मोठा खेळाडू आहे. सामन्यात भारतावर अनेकवेळा दडपण आले, पण विराट कोहलीने या दबावावर मात केली. त्याने आपला डाव सुरूच ठेवला आणि हार्दिकसोबत भागीदारी रचली. त्यामुळे मला वाटते की सामना तिथेच बदलला.”
दोन्ही देशांमधील या सामन्यात विराट कोहलीच्या खेळीने काय फरक पडला ? असे बाबरला विचारले असता, त्याने दिलेले उत्तर हृदय पिळवटून टाकणारे होते. तो म्हणाला की, “तुम्ही बाबर आणि विराटच्या अनेक खेळी पाहिल्या असतील. तुम्हाला असे वाटते की कोहलीच्या या खेळीने फरक पडला तर वस्तुस्थिती अशीच आहे. कोहलीच्या खेळीने खरोखरच फरक पडला आणि त्यामुळेच त्यांनी सामना जिंकला.”
विराट कोहलीने पाकिस्तानविरुद्ध कालच्या सामन्यात नाबाद ८२ धावांची खेळी केली. त्यामुळे हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या सामन्यात भारताने ४ गडी राखून बाजी मारली. या सामन्यात पाकिस्तानने भारताला विजयासाठी १६० धावांचे लक्ष्य दिले होते आणि भारताने २० षटकात ६ गडी गमावत १६० धावा करत सामना जिंकला. विराट कोहलीच्या या खास खेळीसाठी त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.