IND vs PAK – टी-२० विश्वचषक २०२२ च्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध संघर्षमय विजय मिळवला. भारताच्या या विजयाचा हिरो ठरला ‘रन मशीन’ विराट कोहली. दिवाळीच्या मुहूर्तावर या विजयाने देशवासीयांच्या चेहऱ्यावर जणू आनंदाची लाट आली आहे. दुसऱ्या डावात भारताच्या फलंदाजीच्या वेळी संघाची धावसंख्या एका क्षणी ४ बाद ३१ अशी होती. त्यामुळे हा सामना भारताच्या हाताबाहेर गेल्याचे अनेकांना वाटले. मात्र कोहलीने त्याच्या क्रिकेट मधील ‘विराट’ कौशल्याच्या बळावर भारताला विजय मिळवून दिला.
विराट कोहलीने हार्दिक पांड्यासोबत पाचव्या विकेटसाठी ११३ धावांची शतकी भागीदारी केली. मात्र शेवटच्या महत्वाच्या क्षणी हार्दिक पंड्या ४० धावा करून बाद झाला. यानंतर पुन्हा एकदा सामना भारताच्या आवाक्याबाहेर जात असल्याचे वाटले. परंतु भारताचा ‘चेज मास्टर’ विराट कोहली अजूनही खेळपट्टीवर होता. विराटच्या संयमी फलंदाजीच्या बळावर भारताने शेवटच्या क्षणी सामना जिंकला. या सामन्यात कोहलीने ५३ चेंडूत ४ षटकार आणि ६ चौकारांच्या मदतीने नाबाद ८२ धावांची धडाकेबाज पारी खेळली.
रोहितने विराटला खांदयावर घेतले तर हार्दिकला अश्रू अनावर झाले
संघाच्या विजयानंतर कर्णधार रोहित शर्मा मैदानात आला आणि त्याने विराट कोहलीला खांद्यावर उचलून घेतले. यावेळी विराट कोहलीसह संघातील इतर खेळाडूंचा आनंद शिगेला पोहोचला होता. तर दुसरीकडे सामना संपल्यानंतर हार्दिक पांड्या जेव्हा अँकर इरफान पठाणशी बोलत होता तेव्हा त्याला आनंदाश्रू अनावर झाले. या प्रेम आणि आदरासाठीच आम्ही खेळतो, असे यावेळी बोलताना हार्दिक म्हणाला.
विराट कोहली म्हणाला की, आजची ही पारी माझ्या आयुष्यातील सर्वात ग्रेट पारी आहे. आजच्या या सामान्याला मी कधीच विसरू शकणार नाही. त्याचबरोबर विराटने सर्व भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या. यापुढेही संघ चांगली कामगिरी करेल आणि विश्वचषक जिंकण्याच्या दिशेने पाऊल टाकेल, असा विश्वास कर्णधार रोहित शर्माने व्यक्त केला.