IND vs PAK T20 WorldCup Match – संपूर्ण देश आज दिवाळीचा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करत आहे. मात्र भारतीयांसाठी खरी दिवाळी तर कालच पार पडली. भारताने पुन्हा एकदा पाकिस्तान संघाला टी-२० विश्वचषकात धूळ चारली. भारताने मागील वर्षी झालेल्या पराभवाचा बदला घेतला. भारताने ४ गडी राखून पाकिस्तान संघावर विजय मिळवला. सर्वांच्याच हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या या सामन्यात विराट कोहलीचा विजयी खेळ पाहायला मिळाला. विराटने ५३ चेंडूत ४ षटकार आणि ६ चौकार साहाय्याने ८२ धावांची धडाकेबाज पारी खेळली.
ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील एमसीजी मैदानावरील खेळपट्टी फलंदाजीसाठी कठीण होती. भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. अवघड खेळपट्टीवर पाकिस्तानी संघ आगोदर फलंदाजी करताना १५९ धावांपर्यंत पोहोचला. भारताकडून अर्शदिप सिंग आणि अष्टपैलू हार्दिक पंड्या यांनी पाकिस्तानच्या फलंदाजांना जखडून ठेवले. पाकिस्तानच्या फलंदाजीची भिंत असलेल्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना अत्यंत स्वस्तात अर्शदिपने बाद केले होते.
#T20WorldCup #INDvPAK : असे रंगले अखेरचे षटक, पहा व्हिडीओ….
पाकिस्तानने दिलेल्या १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला मोठी कसरत करावी लागणार हे नक्की होते. भारताचे पहिले ४ गडी अवघ्या ३० धावांवर गमावले होते. तेथून पुढे कोहलीचा ‘विराट’ खेळ अवघ्या जगाला पाहायला मिळाला. त्याच्या दमदार फलंदाजीची प्रशंसा संपूर्ण देशभरातील दिग्गजांकडून केली जात आहे.
दरम्यान या सामन्यात खूप साऱ्या अविश्वसनीय अशा घटना घडल्या. मोहम्मद नवजाच्या २०व्या षटकातील चौथ्या चेंडूवर विराटने षटकार खेचला. विशेष म्हणजे चेंडूच्या उंचीच्या कारणामुळे पंचांनी तो चेंडू नो-बॉल ठरवला. म्हणजे पुढचा चेंडू फ्री-हिट स्वरूपाचा होता. या चेंडूवर विराट क्लीन बोल्ड झाला. पण विराट आऊट होऊनही या चेंडूवर कार्तिक आणि त्याने ३ धावा काढल्या. यावर पाकिस्तानचे खेळडू थेट पंचांशी भिडले.
अशा वेळी क्रिकेटचा नियम काय सांगतो?
एखादा चेंडू पंचांकडून नो-बॉल ठरवण्यात आल्यावर त्यापुढील चेंडू हा फ्री-हिट असतो. म्हणजे या चेंडूवर तुम्ही बिनधास्त मोठा फटका खेळू शकता. कारण या चेंडूवर ‘धाव बाद’ हा प्रकार सोडला तर फलंदाज इतर कोणत्याही प्रकारे बाद होत नाही किंवा बाद दिले जात नाही. त्यामुळे पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विराट क्लीन बोल्ड होऊनही त्याने आणि कार्तिकने ३ धावा काढल्या होत्या. त्यानंतर पंचांनी हा चेंडू विराटच्या बॅटला लागला नसल्यामुळे ‘बाय रन’ म्हणून या धावा घोषित केल्या. मात्र दुसरीकडे पाकिस्तानच्या खेळाडूंना हा नियमच माहित नाही असेच चित्र दिसत होते.