बेल्हे – जुन्नर तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिक करोनामुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. चिकनमधून करोना होतो या चुकीच्या अफवेमुळे करोनाचा पहिला फटका पोल्ट्री व्यवसायाला बसला आहे; परंतु अजूनही पोल्ट्री व्यावसायिकांनी उभारी घेतली नाही. सुरुवातीला सोशल मीडियावर चिकनमधून करोना होतो, अशा अफवांना उधाण आले, त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत सापडले आहेत. याचा परिणाम इतका प्रचंड झाला आहे.
त्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक कर्जबाजारी होण्याच्या मार्गावर आहेत. जुन्नर तालुक्यात महिनाभरात सुमारे 5 लाख 70 हजार अंडी पडून आहेत. त्यामुळे पोल्ट्री व्यवसाय ठप्प पडला आहे.
दरम्यान, आम्हाला सरकारने अनुदान द्यावे किंवा आमच्या पोल्ट्रीचे कमीतकमी तीन महिन्यांचे तरी लाईट बिल माफ करावे, अशी मागणी आता पोल्ट्री व्यावसायिकांकडून जोर धरू लागली आहे. जुन्नर तालुक्यात सुमारे 450 पोल्ट्री व्यावसायिक आहेत. तालुक्यात प्रबळ अशी पोल्ट्री व्यवसायिकांची संघटना नसल्यामुळे व्यावसायिक सरकारकडे दाद मागण्यासाठी जात नाहीत.
गेल्या दोन महिन्यांपासून करोनाचा फटका कोणताही संबंध नसताना बॉयलर कोंबड्यांना बसत आहे. उन्हाळा सुरू आल्याने चिकन, अंडी खाणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. मागणी नसल्यामुळे अनेक व्यावसायिकांनी मागच्या महिन्यात आपल्या कोंबड्या पाच रुपये ते दहा रुपये किलो या भावाने आठवडे बाजारांमध्ये गाडी लावून विकण्याचा वेळ पाहिल्यांदा आली होता.
जुन्नर तालुक्यात पाच दिवसांत 95 हजार अंड्यांची विक्री होते. या हिशेबानुसार एका महिन्यात 5 लाख 70 हजार विक्रीअभावी पडून आहेत. संपूर्ण देशात लॉकडाऊन असल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना आपला माल विक्रीसाठी घेऊन जाता येत नाही. त्यामुळे प्रति व्यावसायिकांचे महिन्याकाठी दहा ते बारा लाखांचे नुकसान होत आहे.
आम्ही 45 दिवसांपूर्वी 13 हजार 500 पक्षी आणले होते. 45 दिवसांचा खर्च 18 लाख 50 हजार रुपये आला आहे. करोनामुळे ग्राहक मिळत नव्हते. मागील आठवड्यात पाच रुपये प्रतिकिलोने कोंबड्या विकाव्या लागल्या होत्या. यामध्ये मला फक्त 4 लाख 20 हजार रुपये मिळाले. माझे 15 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. माझी वातानुकूलित पोल्ट्री असल्याने सरकारने पोल्ट्रीचे लाइट बिल माफ करावे, अशी सरकारला विनंती आहे.
– उत्तम डुकरे, वातानुकूलित पोल्ट्री व्यावसायिक, औरंगपूर.
मी 8 हजार पक्षी आणले होते. माझे पक्षी पंधरा दिवसांपूर्वी 10 रुपये किलोने विकले गेले. नोव्हेंबर महिन्यात 90 ते 100 रुपये किलोचा भाव मला मिळाला होता. थोडक्यात, दहा रुपये किलोने विकले गेले आहेत. उत्पादन खर्च सुद्धा निघाला नाही. माझे या लॉटमध्ये 8 ते 9 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. करोनाचे मोठे संकट पोल्ट्री व्यावसायिकांवर आल्यामुळे सरकारने आम्हाला अनुदान द्यावे, अशी सर्व पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी आहे.
– तन्वीर पटेल, पोल्ट्री व्यावसायिक, राजुरी.