वाहनचालक चिंतेत; कर्जत तालुक्यात पुलाची कामे निकृष्ट
कर्जत – तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर पुलाची कामे होत आहेत. मात्र ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत असल्याचे समोर येत आहे. काम पूर्ण झाल्यानंतर चार दिवसातच नांदगाव-बर्गेवाडी रस्त्यावरील पूल खचल्याने वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रयत्नातून आणलेल्या निधीतून कर्जत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पुलांची कामे होत आहेत. मात्र ठेकेदारांकडून ही कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची होत आहेत. बांधकामाचे नियम धाब्यावर बसून ही कामे आटोपली जात आहेत. बांधकाम सुरू असताना रस्ता सुरक्षेचे नियम ठेकेदाराकडून पाळले जात नाहीत. माहिती फलकांचा अभाव, सपाटीकरण न केलेले पर्यायी रस्ते, परावर्तकांचा अभाव यामुळे अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. नांदगाव- बर्गेवाडी या रस्त्यावरून जाणाऱ्या ट्रॅक्टरचा ट्रेलर मध्यभागी खचला. त्यामुळे रस्त्याच्या निकृष्ट कामाचे बिंग फुटले. माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या कार्यकाळात याच प्रकारच्या मोठ्या तक्रारी होत्या. आता लोकप्रतिनिधी बदलूनही ठेकेदारांच्या कामाची पद्धती मात्र बदलल्याचे दिसत नाही.