नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या शंभर पेक्षा जास्त दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांची निदर्शने सुरू आहेत. मात्र हे कायदे मागे घेणे केंद्राच्या हातात नाही. कारण केंद्र सरकार उद्योगपती मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या दबावाखाली काम करत असल्याचा दावा भारतीय किसान युनियनचे नेते जोिंगंदर सिंह उग्राहन यांनी केला आहे.
द वायर ने यासंदर्भात दिलेल्या बातमी उग्राहन यांनी म्हटले आहे की आता हे कायदे रद्द करणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातात राहीलेले नाही. ते मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या दबावाखाली आणि त्यांच्या इशाऱ्यानुसार काम करत आहेत. आपण केवळ हवेतल्या गप्पा करत नसून शेतकऱ्यांच्या नेत्यांसोबत जेव्हा कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांची 15 जानेवारी रोजी बैठक झाली होती, त्यावेळी त्यांनीच हा खुलासा केला असल्याचे उग्राहन यांनी म्हटले आहे.
जालंदर जिल्ह्यात मजदूर एकता किसान रॅलीत भाषण करताना ते म्हणाले की, यावेळी उग्राहन यांनी तोमर यांनी नेमके काय म्हटले होते ते ऐकवले. जर त्यांनी (मोदींनी) आपल्या मागण्या मान्य केल्या आणि कायदे मागे घेतले तर दुसऱ्या दिवशी अदानी आणि अंबानी येतील असे तोमर म्हणाल्याचा दावा त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की उद्योगपतींचा प्रकार वेगळा असतो. त्यांना आपण कधी रेल्वे अथवा रस्ता रोको करताना पाहिले आहे का? ते रस्त्यावर उतरणार नाहीत. मात्र तुमच्यावर दबाव टाकतील. तोमर यांना हे सांगायचे नसते. कारण अशा गोष्टी सांगणे त्यांच्या धोरणात बसत नाही. मात्र चुकुन हे त्यांच्या तोंडातून निघून गेल्याचेही उग्राहन यांनी नमूद केले.