नवी दिल्ली -भारतीय कुस्ती महासंघाच्या सर्व पदाधाकाऱ्यांना अपात्र ठरवले गेले आहे. सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या जात असून मागण्याही योग्य रीतीने पूर्ण केल्या जातील. मात्र, आता झाले तेवढे बस झाले, आंदोलन मागे घ्या, असे आवाहन केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंना केले आहे. जंतरमंतरवर सुरू असलेल्या भारतीय कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा हा 23 वा दिवस आहे. या आवाहनानंतरही ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक केली जात नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असे सांगत कुस्तीपटू मात्र आंदोलन सुरूच ठेवण्यावर ठाम आहेत.
कुस्तीपटूंच्या मागण्यांची दखल घेतली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषण केल्याबद्दल एफआयआरही दाखल करण्यात आली आहे. तसेच भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे (आयओए) महासंघाचे सर्व कामकाज आपल्या हाती घेतले आहे. त्यामुळे आता कुस्तीपटूंना संप मागे घ्यावा, असे आवाहन ठाकूर यांनी केले आहे.
एक समिती नियुक्त करण्यात आली असून ती कुस्तीपटूंचे म्हणणे तसेच त्यांच्या मागण्या ऐकून घेत आहे. क्रीडा मंत्रालयाने जानेवारी महिन्यातच समिती स्थापन केली होती. महासंघाच्या नव्या निवडणुकाही येत्या 45 दिवसांत घेतल्या जाणार आहेत. दोषींवर कारवाई करण्याचे पाऊल टाकले गेले आहे, असेही ठाकूर यांनी म्हटले आहे.
कुस्तीपटू आंदोलनावर ठाम
ब्रिजभूषण यांना अटक होईपर्यंत हे आंदेलन सुरूच राहणार आहे. देशाच्या न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, वरवरची कारवाई समाधानकारक नसून ठोस कारवाई व्हावी, तसेच आमची प्रमुख मागणी ब्रिजभूषण यांची अटक असून ती पूर्ण झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असे मत कुस्तीपटूंनी व्यक्त केले आहे.