दुबई -आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फलंदाज झेलबाद तसेच अन्य काही निर्णय देण्यापूर्वी सॉफ्ट सिग्नल देतात. म्हणजेच तिसऱ्या पंचाची मदत घेतात. मात्र, त्यांनाही निर्णय घेताना अडचणी आल्या तर ते मैदानी पंचाचे मत घेत निर्णय देतात. यावर अनेकदा फलंदाजांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, आता हा सॉफ्ट सिग्नलचा नियमच क्रिकेटमधून बाद करण्यात आला आहे.
बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली हे आयसीसीच्या क्रिकेट समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्यासह बीसीसीआयचे विद्यमान सचिव जय शहा यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. अनेक देशांच्या क्रिकेट मंडळांच्या सदस्यांशी चर्चा करून अखेर आयसीसीने हा नियम काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 7 ते 11 जून या कालावधीत भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यात इंग्लंडमधील ओव्हल मैदानावर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना होत आहे, याच सामन्यापासून आयसीसी सॉफ्ट सिग्नलसह अन्य काही बदल अंमलात आणणार आहे.
मैदानी पंच झेल तसेच अन्य निर्णयासाठी तिसऱ्या पंचाची मदत घेत असतात. सर्व रिप्ले व विविध कॅमेरा अँगल पाहूनही तिसरे पंच समाधानी नसतील तर ते मैदानावरील पंचाची मदत घेत निर्णय जाहीर करत होते. जर मैदानावरील पंचाने फलंदाज बाद असल्याचा निर्णय दिले असेल तर तोच निर्णय कायम ठेवला जात असे. आता तसे घडणार नाही.
आयसीसीच्या या निर्णयामुळे येत्या काळात कसोटी क्रिकेटसह सर्व आंतरराष्ट्रीय सामन्यांचे रद्द होणे कमी होणार असून सामने निकाली होण्यास मदत होणार आहे. आता आयसीसीने कसोटी केंद्रेही आशीच निवडण्याचे निश्चित केले आहे जिथे फ्लड लाईट्सची सुविधा असेल. गुलाबी चेंडूंवर खेळल्या जाणाऱ्या सामन्यांची संख्याही त्यामुळे वाढू शकते.
…तर फ्लड लाईट्स लावून खेळ होईल
सॉफ्ट सिग्नलच्या नियमासह आयसीसीने गांगुली यांच्या समितीने सुचवलेले आणखी दोन बदल अंमलात आणण्याचे निश्चित केले आहे. अंधुक प्रकाशामुळे अनेकदा सामन्याचा खेळ थांबवला जातो किंवा सामन्यातील उर्वरित खेळ रद्द केला जातो.
आता तसे घडणार नाही. अंधुक प्रकाश असेल तर मैदानावरील फ्लड लाईट्स सुरू करून खेळ व सामना पूर्ण खेळला जाणार आहे. तसेच जर एकच सामना होणार असेल तर त्यासाठी एक दिवस राखीवही ठेवला जाणार आहे.