काळजी घेण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष; रुग्णांची संख्या 1 लाख 12 हजार पार
पिंपरी – पिंपरी चिंचवड शहरातील करोनाबाधित रुग्णांची संख्या रोज झपाट्याने वाढत आहे. शहरात आता पुन्हा रोज 700 ते 800 रुग्ण आढळून येत आहे. ऑक्टोबर महिन्यापासून कमी होत असलेले करोनाबाधितांचे आकडे मार्चमध्ये मोठ्या प्रमाणात वाढण्यामागे गांभीर्याचा अभाव असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. शहरातील नागरिकांकडून सोशल डिस्टन्सिंग, मास्क आदी नियमांचा फज्जा उडविला जात आहे. त्याकडे महापालिका आणि पोलीस प्रशासनानेही दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे.
शहरातील आतापर्यंतची एकूण रुग्णसंख्या 1 लाख 12 हजार 370 वर पोहचली आहे. दुसरीकडे रोज बऱ्या झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज दिला जात असतानाही उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. ही वाढ वैद्यकीय विभागावर ताण आणणारी ठरु शकते. मार्च महिन्याच्या सुरुवातीला शहरात सक्रिय रुग्णांची संख्या 3423 इतकी होती. बारा दिवसांमध्ये यात सुमारे 78 टक्क्यांची वाढ होऊन सक्रिय रुग्णांची संख्या 6134 इतकी झाली आहे. वाढीचा हा दर प्रचंड आहे. तसेच आतापर्यंत शहरात करोनाने 2657 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात शहरातील 1870 तर शहराबाहेरील 787 नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
शहरामध्ये बाधितांमध्ये वाढ होऊ लागल्यानंतर काही निर्बंध घालण्यात आले. त्यामध्ये रात्रीची संचारबंदी करण्यात आली आहे. असे असले तरी शहरामध्ये नागरिकांकडून अनेक नियम पायदळी तुडवले जात आहेत. सामाजिक अंतराच्या नियमाचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. शहरातील हॉटेल, चहाच्या टपऱ्या, पानटपऱ्या यावर नागरिकांची तोबा गर्दी बघायला मिळत आहे. यामध्ये अनेकांच्या नाका-तोंडावर मास्क नसतो. तसेच अनेकजण जवळ-जवळ उभे राहून गप्पा मारत असतात. याठिकाणी कुठल्याही नियमांचे पालन केले जात नाही.
शहरातील पिंपरी कॅम्प ही प्रमुख बाजारपेठ आहे. येथे खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी असते. मात्र दुकानदार व ग्राहक नियम पाळत नसल्याचे चित्र आहे. अनेक ग्राहक एकाच दुकानात गर्दी करतात. त्यामुळे याठिकाणीही करोना विषाणूचा फैलाव होण्यास वाव मिळत आहे. शहरातील सोसायट्यांमध्ये अनेक भाजी व फळ विक्रेते फिरत असतात. हातगाडीवर ठेवलेल्या भाज्यांना तसेच भाजी घेण्यासाठी ठेवलेल्या टोपलीला अनेकांचा वारंवार स्पर्श होतो. त्यामधूनही संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे. रोज शेकडो लोकांच्या संपर्कात येणारे अनेक भाजी विक्रेते मास्कचा वापर करत नसल्याचे दिसून येत आहे.
मार्च महिन्यांपासून लग्नसराई सुरू झाली आहे. त्यामुळे लग्नाच्या खरेदीसाठी शहरातील कापड दुकांनामध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. लग्नाची खरेदी असल्याने एक-दोघांऐवजी नातेवाइकांसह खरेदीसाठी येत असतात. तसेच इतरही दुकानांमध्ये सध्या गर्दी होताना दिसत आहे. अनेक दुकानदार मास्क खाली करुन ग्राहकांशी बोलत असतात. दुकानदारही करोनाच्या नियमांबाबत जागरुक नसल्याचे वास्तव आहे.
बॅंकांमध्ये भलीमोठी रांग
शहरात अनेक ठिकाणी बॅंकामध्ये भली मोठी रांग लागलेली दिसते. बॅंकेतील सुरक्षारक्षकांची जबाबदारी आहे की नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करायला लावणे. मात्र अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकांचाच पत्ता नसतो. एटीएममध्येही निर्जंतुकीकरण केले जात नाही. त्यामुळे त्याठिकाणाहून करोना विषाणूचे संक्रमण होण्याची शक्यता आहे.
सॅनिटायझर गायब
शहरामध्ये मागील वर्षी करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला. त्यावेळी सर्व आस्थापनांच्या प्रवेशद्वारावर हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायजर ठेवण्यात आले होते. दरम्यानच्या काळात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आस्थापने, दुकाने यांच्या प्रवेशद्वारावरील सॅनिटायजर गायब झाले आहे. त्याचा वापर होत नसल्यानेही करोनाचा संसर्ग वाढत आहे.