नवी दिल्ली – संसदेचे हिवाळी अधिवेशन करोनाच्या साथीमुळे रद्द करण्यात आले आहे. शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी अधिवेशन बोलावण्याची मागणी केली होती. त्या पत्राला उत्तर देताना संदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ही माहिती दिली आहे, असे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.
राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना अनौपचारिकरित्या ही माहिती दिली आहे. नेहमी नोव्हेंबरमध्ये सुरू होऊन डिसेंबरमध्ये अखेर होणाऱ्या हे अधिवेशन टाळावे, अशाच मताचे ते होते, असे जोशी यांनी पत्रात नमूद केले आहे. साथीच्या काळात हिवाळा अत्यंत महत्त्वाचा ठरतो. सध्या आपण डिसेंबरच्या मध्यात आहोत आणि करोनावरील लस लवकरच अपेक्षित आहे, असे जोशी यांनी सांगितले.
सरकारची पुढील अधिवेशन लवकरात लवकर घेण्याची इच्छा आहे. करोनाच्या साथीमुळे निर्माण झालेल्या अभूतपूर्व स्थितीचा विचार करता जानेवारी 2021 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन घेणे योग्य ठरेल, असे जोशी यांनी कळवले आहे.
भारत-चीन सीमेवरील तणाव, आर्थिक मंदी, करोनावरील लस आणि शेतकऱ्यांची निदर्शने या महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी संसदेचे अधिवेशन आयोजित करण्याची मागणी अधिर रंजन चौधरी यांनी केली होती. अधिवेशन रद्द केल्याचे समजताच चौधरी यांनी समाज माध्यमांतून सरकारवर हल्लाबोल केला आहे.
सप्टेंबरमध्ये करोना बाधितांची संख्या सर्वाधिक असताना पावसाळी अधिवेशन निमंत्रित केले होते, याची त्यांनी आठवण करून दिली. हजारो शेतकरी कडाक्याच्या थंडीत दिल्लीच्या सीमांवर नवे कृषी कायदे रद्द करावेत म्हणून आंदोलन करत आहेत. त्यामुळेच हे अधिवेशन रद्द केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.