मुंबई – सध्या राज्यात असलेली राजकीय परिस्थिती यामुळे कधी कोणती निवडणूक लागेल हे सांगणं कठीण आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये नेत्यांनुसार दोन – दोन गट पडलेले असताना आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये मोठी चुरस पाहायला मिळणार आहे. अशात माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी लोकसभा निवडणूक लढणार का ? याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. (shivsena uddhav thackeray)
एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणासह त्यांच्यावर होणाऱ्या पेग्विंनच्या टीकेवर देखील भाष्य केले.बेबी पेग्विंन अशी टीका आदित्य ठाकरेंवर वारंवार होते याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले,”६ वर्षांपूर्वी आम्ही मुंबईत पेग्विंन घेऊन आलो. कोणत्याही प्राण्याची जगभरातून आयात करताना मोठा पत्रव्यवहार करावा लागतो. त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच त्यांना भारतात आणलं होतं. आज पेंग्विनमुळे प्राणीसंग्रहालय नफ्यात आलं आहे” (loksabha 2024)
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले,”दरदिवशी तीस हजार लोक प्राणीसंग्रहालयाला भेट देतात आणि पेंग्विन कसे आहेत हे पाहतात. आता पेंग्विनची स्थिती पाहा आणि चित्त्याची पाहा. आमच्या पेंग्विनने मुंबई पालिकेला पन्नास खोक्यांचं उत्पन्न मिळवून दिलं. पण जे पळून गेले ते स्वतःसाठी पन्नास खोके घेऊन पळाले” असा टोला देखील आदित्य ठाकरेंनी लगावला.
आगामी काळात लोकसभेची निवडणूक लढवणार का ? असा सवाल देखील आदित्य ठाकरेंना यावेळी विचारण्यात आला. त्यावर आदित्य यांनी मिश्कील टिपण्णी केली असता त्यांना पुन्हा सविस्तर विचारले असता ते म्हणाले,”पक्ष मला जी जबाबदारी देईल ती निवडणूक मी लढवेन. पक्ष जी जबाबदारी देईल ती मान्य असेल.”