नवी दिल्ली – दिल्लीतील कथित दारु घोटाळ्याप्रकरणी आम आदमी पक्षाचे नेते आणि खासदार संजय सिंह यांना बुधवार (4 ऑक्टोबर) रोजी अटक झाली आहे. दरम्यान याप्रकरणी याआधी आम आदमी पक्षाचे सत्येंद्र जैन आणि मनीष सिसोदिया यांनाही अटक करण्यात आली असून ते दोघेही तुरुंगात आहेत. ईडीने संजय सिंह यांची जवळपास 10 तास चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. या अटकेनंतर दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केरीवाल यांनी बुधवारी संजय सिंह यांच्या निवासस्थानी भेट दिली.
यावेळी अरविंद केजरीवाल यांनी राज्यसभा खासदार संजय सिंह यांचे वडील, त्यांची पत्नी आणि इतर कुटुंबातील सदस्यांची भेट घेतली. संजय सिंह यांच्या कुटुंबियांच्या भेटीनंतर केजरीवाल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली.
#WATCH | After meeting the family of AAP MP Sanjay Singh, Delhi CM & AAP national convenor Arvind Kejriwal says, “AAP is a staunch honest party. We all know that the path of honesty is difficult. If we will become dishonest like them then all of our problems will be… pic.twitter.com/S7fSlTwBHt
— ANI (@ANI) October 4, 2023
अरविंद केजरीवाल म्हणाले, “आम आदमी पार्टी ही एक कट्टर प्रामाणिक पार्टी आहे. आपल्या सर्वांना माहीत आहे. प्रामाणिकपणाचा रस्ता खूप कठीण असतो. आज आम्ही या लोकांसारखे (भाजपा) बेईमान झालो तर आमच्या सर्व समस्या संपतील. आम्ही कट्टर ईमानदार आहोत. यामुळेच आम्हाला विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. हेच यांचे मोठे दु:ख आहे. हे डोक्यापासून पायापर्यंत भ्रष्टाचारी आहेत. त्यांना आमच्या ईमानदारीचा विरोध करता येत नाहीये.”
“दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी ईडीने आतापर्यंत एक हजाराहून अधिक छापे मारले. अनेक लोकांना अटक केली. हा शंभर कोटींचा घोटाळा असल्याचा दावा त्यांच्याकडून केला जातो, मात्र एवढी छापेमारी करूनही त्यांना एक पैसाही सापडला नाही. ना जमिनीचे दस्तावेज सापडले, ना सोन्या-चांदीचे दागिने मिळाले. मागील एक वर्षात यांना काहीच मिळाले नाही. तरीही ते जबरदस्तीने लोकांना अटक करत आहेत”.
“आज यांनी संजय सिंह यांना अटक केली आहे. संजय सिंह हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भ्रष्टाचाराविरोधचा सर्वात बुलंद आवाज आहेत. नरेंद्र मोदी डोक्यापासून पायापर्यंत भ्रष्टाचारात बुडाले आहेत. स्वातंत्र भारताचे सर्वात भ्रष्टाचारी पंतप्रधान कुणी असेल तर ते नरेंद्र मोदी आहेत. उद्या यांचं सरकार गेले आणि त्यांच्या कारभाराची चौकशी झाली, तर लक्षात येईल यांनी किती भ्रष्टाचार केला आहे. या भ्रष्टाचाराविरोधात संसदेत आणि संसदेबाहेर सर्वात बुलंद आवाज संजय सिंह होते. हे मोदींना बघवलं नाही. त्यामुळे त्यांनी आधी संजय सिंह यांना संसदेतून निलंबित केलं आणि आज खोट्या प्रकरणात अटक केली.”
नवीन मद्यधोरण काय आहे?
दिल्ली सरकारने दिल्लीतील मद्य व्यापारातून स्वत:ला वेगळे केले आहे. या धोरणामुळे मद्याची सरकारी दुकाने बंद झाली आहेत आणि खासगी परवाने सरकारने जारी केले आहेत. दारू पिण्याचे वयही दिल्ली सरकारने 25 वरून 21 वर आणले आहे. सरकारचा महसूल वाढवणे, मद्य माफियांचा प्रभाव कमी करणे, ग्राहकांची सोय आणि मद्याचा काळा बाजार रोखणे हे धोरणाचे मुख्य उद्दिष्ट होते. हे धोरण नोव्हेंबर 2021 पासून अंमलात आले होते.
या धोरणामुळे मद्यातून मिळणाऱ्या महसुलात 27 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आता हा महसूल 8900 कोटींवर गेला आहे. या धोरणामुळे मद्याचा दर ठरविण्याची मुभा मालकांना दिली होती. त्यामुळे MRP वर सूट मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. सर्व दुकाने पहाटे तीन वाजेपर्यंत उघडी ठेवण्याची मुभा दिली होती. होम डिलिव्हरीचा पर्यायही त्यांनी ठेवला होता. त्यामुळे परिणामी दिल्लीत काही काळ मद्यावर मोठी सूट दिली जात होती. शिवाय अनेक मद्यविक्रेत्यांनी मोठी सूट देत एकावर एक फ्री बाटल्या विकल्या होत्या.
फेब्रुवारीत मनीष सिसोदिया यांना अटक –
दिल्लीतील दारू घोटाळ्याप्रकरणी फेब्रुवारी महिन्यात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने 8 तास चौकशीनंतर अटक केली होती.