जळोची – उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या बरोबरचे सर्व आमदार महायुतीसोबत आहेत. महाराष्ट्रात कोणी म्हणते 45, कोणी म्हणते 46 मात्र मी या आधीच सांगितले आहे की “आऊट ऑफ’ बारामतीसह लोकसभेच्या 48 जागा जिंकू आणि पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी विराजमान करू, असा विश्वास ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी बारामतीत व्यक्त केला.
धनगर आरक्षणासंदर्भात अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे गेल्या 18 दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनस्थळी मंत्री गिरीश महाजन मंगळवारी (दि. 26) भेट देण्यासाठी जाणार होते, त्यापूर्वी ते बारामती आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
गिरीश महाजन म्हणाले की, बारामतीकरांचा माझ्या म्हणण्यावर किती विश्वास आहे माहिती नाही; मात्र मी गेली 30 वर्षे आमदार आहे. मी जे बोलतो त्यात चुकीचे काही निघत नाही असे म्हणत विरोधकांना “क्लीन बोल्ड’ करून लोकसभेच्या 100 टक्के जागा निवडून आणण्याचा विश्वास मंत्री गिरीश महाजन यांनी बारामतीत व्यक्त केला. मराठा आरक्षणाबाबत महाजन म्हणाले की, आरक्षणासंदर्भात समिती स्थापन करण्यात आली आहे. न्यायमूर्ती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यास सुरू आहे. 40 दिवसांची मुदत अद्याप संपलेली आहे. दरम्यानच्या काळात आम्ही योग्य मार्ग काढू असे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांनी स्वत:चे लोक सांभाळावेत
पंकजा मुंडे यांच्यावर भाजपकडून अन्याय केला जातोय या बाबत बोलताना महाजन म्हणाले की, विरोधकांचे ते कामच आहे. विरोधकांनी स्वतःचे लोक सांभाळावेत. राष्ट्रवादीतून पुन्हा लोक निघायला लागली आहेत. उद्धव ठाकरे यांच्याकडे कोणी थांबायला तयार नाही. स्वतःचे सोडायचे आणि दुसऱ्याच्या माग पळायचे…हा उद्योग विरोधक का करतात.. काही कळत नाही. त्यांनी त्यांचा पक्ष सांभाळावा. आम्ही आमचा पक्ष संभाळायला समर्थ आहोत. पंकजा मुंडे आमच्या सोबतच आहेत. असे म्हणत मंत्री गिरीश महाजन यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिले.
धनगर आरक्षणाबाबत मार्ग निघाला
गेल्या 18 दिवसांपासून चौंडी येथे धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलन सुरू आहे. गेल्या चार-पाच दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत आरक्षणासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. या बैठकीतून सकारात्मक मार्ग निघाला असल्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केले.