मुंबई – तीन पक्षांची महाविकास आघाडी हे महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य आहे आणि भाजपबरोबरच्या फेरयुतीसाठी दोन्ही पक्षांमध्ये कोणतीही चर्चा सुरू नाही. दोन्ही पक्षांत अंडर द टेबल डील केले जात असल्याच्या आरोपातही तथ्य नाही असे प्रतिपादन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.
पक्षाच्या मुखपत्रातील साप्ताहिक स्तंभात राऊत यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री आणि सेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 23 जानेवारी रोजी शिवसैनिकांना संबोधित करताना आपल्या आजारपणावर टीका करणाऱ्या भाजपवर टीकास्त्र सोडले होते. ठाकरे यांनी भाजपला हिंदुत्वाबाबतच्या ढोंगीपणाबद्दल फटकारले होते आणि भाजपशी युती करताना शिवसेना कशी कुजली हेही त्यांनी विशद केले होते. “शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसची महाविकास आघाडी ही महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य आहे,
असा संदेश त्यांच्या भाषणातून आला होता. त्यामुळे पुन्हा शिवसेना आणि भाजप एकत्र येऊ शकतात अशा चर्चेत काही एक तथ्य नाही आणि त्या संबंधात गुप्तपणे कोणतीही चर्चा सुरू नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर कोणत्याही गोंधळाला थारा उरलेला नाही असेही संजय राऊत यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या नगर पंचायत निवडणुकांचे निकाल हे राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी आणि विरोधी भाजप या दोघांसाठी दिशादर्शक आहे असेही राऊत यांनी म्हटले आहे.