मुंबई: कोरोना रुग्णांची संख्या रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातच राज्यात रोज विक्रमी कोरोनाबाधितांचा आकडा समोर येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्यात आणखी कडक निर्बंध लादण्याची गरज असल्याचे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले आहे. अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आपले मत कळवले असून राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारी दुपारी 3.30 वाजता होणाऱ्या बैठकी होणार आहे. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांनी राज्यात सध्या नियमावलीत बदल करून अजून कडक नियम करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. सध्या अनेक लोकांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. ती संख्या कमी करावी असे मत अजित पवार यांनी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. राज्यात कठोर निर्बंध लागू करुनही कोरोनाच्या प्रादुर्भाव आटोक्यात येत नसल्यामुळे आता ठाकरे सरकार अत्यावश्यक सेवांच्या यादीत असलेल्या किराणा दुकाने सुरु ठेवण्याची वेळही कमी करणार आहे.
राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत याबाबत अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्यातील व्यापाऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
संभाव्य निर्णयानुसार किराणा दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेतच खुली राहणार आहेत.
या निर्णयाला व्यापाऱ्यांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. सरकारला विनंती आहे की, अत्यावश्यक सेवेतील दुकानाची वेळ कमी केली तर एकाच वेळी मोठी गर्दी होऊ शकते. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या अधिकच वाढेल, असा युक्तिवाद व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शाह यांनी केला आहे.