मुंबई – दसरा मेळाव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे आज अचानक दिल्ली दौऱ्यावर रवाना झाले. अचानकपणे दिल्ली दौऱ्यावर गेल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे मुंबईत असल्याची माहिती समोर आली आहे.
अद्याप या दौऱ्याचे मूळ कारण समोर आले नाही आहे. पण अचानक झालेला दिल्ली दौरा हा आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असणार आहे. मागील काही दिवसांत राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्य मंत्रिमंडळाचा रखडलेला विस्तार, महामंडळ वाटप, आमदार अपात्रता कारवाई आणि सगळ्यात महत्त्वाचे मराठा आरक्षणाच्या मुद्यावर राज्यातील राजकारण-समाजमन ढवळून निघाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षण (Maratha Arakshan) आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange patil) यांनी मराठा आरक्षणासाठी आता आर-पारची लढाई सुरू केली आहे. त्यांनी राज्य सरकारला आरक्षणासाठी दिलेली मुदत 24 ऑक्टोबर रोजीच संपली. त्यानंतर आजपासून पुन्हा एकदा आरक्षणासाठी मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाले आहे. मराठा आरक्षणासाठी केंद्र सरकारने कायदा करून आरक्षण मर्यादा वाढवावी, अशी मागणी होत आहे. या मागणीने भाजपच्या (bjp) नेतृत्वातील सरकारवर आरक्षण देण्याच्या भूमिकेवर शंका उपस्थित होऊ लागली आहे. जरांगे यांनीदेखील पंतप्रधान मोदी यांच्याकडे आरक्षणाची मर्यादा वाढवण्याची मागणी केली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील मिळणार?
30 सप्टेंबर रोजी वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक झाली होती. अचानक झालेल्या या बैठकीमुळे अनेक चर्चांना उधाण आले होते. पितृपक्षाच्या पंधरवड्यानंतर राज्यात सरकार एक महत्त्वाचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने ही बैठक झाली होती. आता पितृपक्षानंतर नवरात्रोत्सव ही संपला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार (Cabinet expantion) आणि महामंडळ वाटपावर शिक्कामोर्तब होणार का, याकडेही लक्ष लागले आहे.