मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारसोबत हातमिळवणी केली. तसेच अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या 9 नेत्यांनीही मंत्री पदाची शपथ घेतली. अशात आता ठाकरे बंधू एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे. याबाबत दिल्लीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारणा करण्यात आली. त्यावर पवारांनी स्मित हास्य करत तीनच शब्दात आपली प्रतिक्रिया दिली.
अजित पवारांच्या बंडखोरीनंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी चर्चा आहे. याबाबत महाराष्ट्रात होर्डिंगही लागत आहेत, असं लक्षात आणून देत शरद पवारांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर शरद पवार स्मित हास्य करत म्हणाले, “चांगली गोष्ट आहे.” असं म्हणत फक्त तीनच शब्दात उत्तर दिले आहे.
दरम्यान,
राष्ट्रवादीच्या बंडानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनीही पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलावली होती. यावेळी उपस्थित नेत्यांपैकी काहींनी लोकसभेत उद्धव ठाकरेंसोबत जायला पाहिजे असं मत व्यक्त केले. मात्र यावर राज ठाकरेंनी भाष्य केले नाही. याशिवाय मनसे कार्यकर्त्यांकडून शिवसेना भवन परिसरात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे असे साद घालणारे बॅनर लावण्यात आले होते. यात “महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला. राजसाहेब – उद्धवसाहेब आता तरी एकत्र या…संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे” असा मजकूर लिहीलेला होता. यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.