Ajit Pawar – कांदा उत्पादक शेतकरी (farmers), कांदा (Onion) खरेदी व्यापारी आणि ग्राहक या सर्वांच्या हिताचाच शासन विचार करेल. येथील कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यांवर केंद्र शासनाच्या सहकार्यातून मार्ग काढला जाईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केला.
पियुष गोयल यांनी आजच संध्याकाळी मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत, कांदा व्यापाऱ्यांच्या प्रश्नी ऑनलाइन बैठक घेऊन तोडगा काढण्याचे तसेच प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीला छगन भुजबळांसह विविध खात्याचे मंत्री उपस्थित होते. शिवाय नाशिकचे जिल्हाधिकारी, नाफेडचे अधिकारी, लासलगाव बाजार समितीचे पदाधिकारी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष खंडू देवरे आदींसह व्यापारी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यापाऱ्यांशी चर्चा करत मागण्यांवर सकारात्मक तोडगा काढणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच या बैठकीतून वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना फोन करत बैठकीचा सविस्तर आढावा देत कांदा प्रश्नावर निर्णय घेण्याची विनंती केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही व्यापाऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समित्यांध्ये बंद ठेवलेली कांदा खरेदी तात्काळ सुरू करावी, असे आवाहन केले आहे. दरम्यान कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यांसंदर्भात मंत्रालयातील बैठकीवर कांदा व्यापाऱ्यांच्या संघटनांनी अद्याप भूमिका मांडलेली नाही.
पवार यावेळी म्हणाले की, देशांतर्गत कांद्याचे दर नियंत्रणात राहण्यासाठी केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर 40 टक्के निर्यात शुल्क लावले आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, म्हणून केंद्र शासनाने 2 हजार 410 रुपये प्रतिक्विंटल दराने नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत 2 लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला होता.
मात्र, दोन्ही यंत्रणांमार्फत अत्यंत कमी प्रमाणात खरेदी करण्यात आली असून खरेदीची मुदतही 10 सप्टेंबरला संपली आहे. त्यातच नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी व्यवहार सुरू करावेत, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.