पाटणा – भारतीय जनता पार्टीपासून फारकत घेतल्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे तसे बरे चालले होते. मात्र, गेल्या काही दिवसांत त्यांनी स्वत:च केलेल्या विधानांमुळे ते अडचणीत येत आहेत. त्यांच्याकडून होत असलेल्या चुकांमुळे आता बिहारच्या राजकारणात असा कयास लावला जातो आहे की नितीश स्वत:च त्यांच्या विरोधात आणि विरोधकांच्या आघाडीच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या हातात शस्त्र देण्याच्या तयारीत आहेत.
अगोदर लोकसंख्या नियंत्रणाच्या विषयावर बोलताना त्यांनी विधानसभेत अशा भाषेचा वापर केला की त्यांच्यावर चौफेर टीका सुरू झाली. त्यामुळे त्यांना दुसऱ्याच दिवशी हात जोडून माफीही मागावी लागली. मात्र त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांच्याबाबत टिप्पणी करून पुन्हा स्वत:ची कोंडी करून घेतली.
गेल्या गुरुवारी आरक्षणाच्या विषयावर बोलताना नितीश यांनी मांझी यांचे नाव घेत उदाहरण दिले. आपल्या चुकीमुळे आणि मूर्खपणामुळेच मांझी बिहारचे मुख्यमंत्री झाले होते असे नितीश म्हणाले. त्यांचे हे अनपेक्षित विधान ऐकून हिंदुस्तानी आवामी मोर्चाचे संस्थापक असलेले मांझी अवाक झाले. नितीश यांना प्रत्युत्तर देताना मांझी म्हणाले की, त्यांची (नितीश) यांची मानसिकता सध्या बरोबर नाही. त्यांचे संतुलन बिघडले आहे.
ते मर्यादेचे उल्लंघन करत आहेत. त्यांच्यापेक्षा मी वयाने चार वर्षे मोठा आणि राजकीय वयही माझे त्यांच्यापेक्षा जास्त आहे. तरीही ते माझा एकेरी उल्लेख करत आहेत. मला मुख्यमंत्री करून चूक केल्याचे जर त्यांना वाटत असेल तर माझ्या मते नितीश कुमार आपले दुबळेपण लपवण्यासाठी एका दलितावरच हल्ला करू शकतात.
दरम्यान, जातीच्या मुद्द्यावरून मांझी गेल्या काही काळापासून नितीश यांच्यावर सातत्याने टीका करत आहेत. बिहारमधील अत्यंत दलित समुदायाचा नितीश अपमान करत असल्याचा त्यांचा आरोप आहे. आपल्याला मुख्यमंत्री करून नितीश यांनी कोणते उपकार केले नाहीत तर दलित समुदायात आपली पकड घट्ट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
त्यांना नामधारी मुख्यमंत्री हवा होता. मी स्वतंत्र निर्णय घेण्यास सुरुवात केल्यावर त्यांनी मला लगेचच हटवले असे एकेकाळी नितीश यांचे अगदी खास असलेल्या मांझी यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनाही नितीश यांच्यापासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. सत्तेच्या लालसेपोटी नितीश यांच्या सहकाऱ्यांकडूनच त्यांच्या जेवणात काहीतरी मिसळले जात असल्याचा दावा करून त्यामुळे नितीश यांचे संतुलन बिघडले असल्याचा गंभीर आरोप मांझी यांनी केला.