शिंदे वासुली – “भामा आसखेड’ग्रस्तांचा सोमवारी (दि. 31) उद्रेक झाला असून त्यांनी थेट उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना टार्गेट केले. तसेच त्यांचा एकेरी उल्लेख करीत समाचार घेतला. पाठीमागे मावळत सहा-सात मारली. इथे पण मावळ करण्याचा विचार आहे काय’, असा घणाघात प्रकल्पग्रस्तांनी केला. दरम्यान, सोमवारी एका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केला. तर पोलिसांच्या गाडीतून उडी मारल्याने एक शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. त्यामुळे आता “भामा आसखेड’प्रकल्पाचा प्रश्न तापला असून आंदोलकांनी “आर या पार’ची भूमिका घेतली आहे.
प्रकल्पबाधित कोळीये, खरवली, वेल्हावळे, शिवे वहागाव आदी गावातील शेतकरी करंजविहिरे येथे तर पाईट पाळू परिसरातील वाचू, टेकवडी, अनावळे, पराळे, कासारी आदी गावातील शेतकरी धामणे फाटा येथे असे 23 गावांतील सुमारे 850 शेतकरी बायका-मुलांसह धरणे व जलभरो आंदोलनासाठी जमा झाले होते; परंतु पोलीस प्रशासनाने आसखेड खुर्द फाटा, जलवाहिनी परिसर, तळशेत, धामणे फाटा, करंजविहीरे आदी ठिकाणी कडक नाकाबंदी केली होती. तरीही मिळेल रस्त्याने येऊन शासनाविरुद्ध आपला “एल्गार’ पुकारला.
ठिकठिकाणी नाकाबंदी करून आंदोलकांना एकत्र येऊ न देण्याची पोलीस प्रशासन खबरदारी घेत होते. सरतेशेवटी तळशेत जवळ सर्व प्रकल्पग्रसत शेतकरी एकत्र येऊन शासनाचा निषेध करीत आंदोलन सुरू केले; परंतु पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवाहन केले. व सर्व धरणग्रस्तांनी चाकण पोलीस ठाण्यामध्ये जाऊन “हल्लाबोल’ करण्याचा विचाराने पिंजरा गाडीत बसले; परंतु पोलिसांनी चाकणकडे निघालेल्या गाड्यामध्येच थांबवून दुसरीकडेच नेण्याचा प्रयत्न केला.
वेळीच पोलिसांचा डाव ओळखून प्रकल्पग्रस्तांनी गाड्यांमधून उड्या घेत जलवाहिनीकडे धाव घेतली. परंतु पोलीस प्रशासन शेतकरी जमावाची पांगापांग करण्यात यशस्वी झाले. दरम्यान, काही आंदोलक महिला व पुरुष काट्याकुट्यातून, आडमार्गाने, शेतातून जलवाहिनीवर येऊन धडकले. व जलवाहिनीच्या पाइपावर येऊन बसले व त्यामुळे जलवाहिनेचे काम ठप्प झाले होते. एक वयोवृद्ध शेतकरी गबाजी सातपुते आंदोलनादरम्यान धामणे घाटात पिंजरा गाडीतून पडल्याने गंभीर जखमी झाले असून करंजविहिरे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत आहे. तर दुसरा एक शेतकरी मारुती बांदल यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान, तळशेत जवळील धामणे फाट्यावर प्रकल्पग्रस्त व पोलीसांमध्ये झटापट झाली. शेतकरी जलवाहिनीकडे जाऊन काम बंद करण्यात आग्रही होते तर पोलीस शेतकऱ्यांना जागचे हालून देत नव्हते. पोलीसांनी खबरदारी म्हणून काही आंदोलन प्रमुखांना बळजबरीने गाडीत कोंबले होते; परंतु बाकीचे शेतकरी गाडीला आडवे होऊन रस्त्यावरच ठिय्या मांडला होता.
पोलिसी बळामुळे आंदोलनाचा भडका
शेतकऱ्यांची समजूत काढण्यासाठी खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेली व तहसीलदार सुचित्रा आमले आले होते. त्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली; परंतु जलवाहिनीचे काम बंद करा मगच आंदोलन मागे घेतो असा अक्रमक पवित्रा घेतला. यावेळी सगळे शेतकरी शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते; परंतु आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर केला. त्यांनी आंदोलकांना वेगळे केले, काहिंना बळजबरीने गाडीत घातले, काही वेळा झटापट झाली, बऱ्याचदा शाब्दिक बाचाबाची झाली, काही आंदोलक महिलांना महिला पोलिसांनी धक्काबुक्की, व अरेरावीची झाली. त्यामुळे आंदोलक अक्रमक झाले. पण कुणाकडूनही उद्रेक वा अनुचित प्रकार झाला नाही; परंतु आंदोलकांनी पोलीस प्रशासनाचा ही निषेध केला.
आंदोलकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न?
आंदोलक स्वत:हून अटक होऊन गाडीत जाऊन बसले. सुमारे 5 ते 6 बस भरून चाकणच्या एका मंगल कार्यालयात ठेवण्यात आले आहे. त्यानंतर आंदोलकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरू असताना त्यातून 22 जणांना वेगळे करण्यात आल्याचे समजले. यावर उपायुक्त स्मिता पाटील यांना विचारले असता त्यांनी योग्य वेळी माहिती दिली जाईल, असे सांगितले.
…ना सत्ताधारी ना विरोधी पक्ष
“भामा आसखेड’ग्रस्तांनी सोमवारी जलभरो आंदोलन केले असले तरी पुढील काळात आंदोलन भडकणार आहे. तुम्ही लाठ्यांनी मारा, झोडा नाही तर पवन मावळासारखा गोळ्या घाला, नाहीतर आम्ही धरणात उड्या घेतो, जलसमाधी घेतो, आत्मदहन करतो अशी अक्रमक भूमिका घेतली आहे. तर हे आंदोलन आमच्या हक्कासाठी आहे. सर्वच पक्षांनी आमचा वापर केला. आता आमच्यासाठी ना सत्ताधारी ना विरोधी पक्ष.