मुंबई – विदर्भ विशेषत: पूर्व विदर्भातील पूरस्थिती गंभीर असून, पुराचे पाणी शिरल्याने भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे.
या भागात राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून पूरग्रस्तांना मदत द्यावी, अशी मागणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस म्हणाले, मध्यप्रदेश सरकारशी योग्य समन्वय न राखल्याने ही स्थिती उद्भवली आहे.
राजीवसागरचे पाणी सोडल्यानंतर ते 36 तासांनी पोहोचते. वेळीच नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला असता तर नुकसान टाळता आले असते. पण, तसे न केल्याने नदीकिनारी राहणाऱ्या घरांचे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. भंडारा जिल्ह्यात सुमारे 5 हजार कुटुंब बाधित असून, चंद्रपुरात 13 गावे बाधित आहेत.
गोंदियात 40 गावे बाधित आहेत. गडचिरोलीत अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. आता तरी मदतीसंदर्भात राज्य सरकारने त्वरित पुढाकार घेतला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.