नवी दिल्ली -भारतात शुक्रवार सकाळपासून 24 तासांत तब्बल 22 हजार 771 नवे करोनाबाधित आढळले. एकाच दिवसातील ती उच्चांकी वाढ ठरली. मागील काही दिवसांपासून बाधितांच्या संख्येत मोठी भर पडत असल्याने भारत लवकरच रशियाला मागे टाकण्याची शक्यता आहे.
करोनाबाधित संख्येच्या जागतिक क्रमवारीत रशिया तिसऱ्या, तर भारत चौथ्या स्थानी आहे. रशियातील बाधितांची संख्या सुमारे 6 लाख 75 हजार आहे. त्यामुळे रशिया आणि भारतामधील बाधितसंख्येत आता फारसे अंतर राहिलेले नाही. भारतात सलग दुसऱ्या दिवशी 20 हजारांहून अधिक बाधित आढळले. आणखी 442 बाधित दगावल्याने देशातील मृतांची संख्या 19 हजारांच्या घरात पोहचली आहे. ती संख्या रशियाच्या जवळपास दुप्पट आहे. त्या देशातील मृतांची संख्या 10 हजारांच्या आसपास आहे.
भारतात सर्वांधिक बाधित आणि बळींची नोंद महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्रातील बाधितांची संख्या 2 लाखांचा टप्पा ओलांडण्याच्या स्थितीत आहे. तामीळनाडूतील बाधितांची संख्या 1 लाखवर पोहचली आहे. दिल्लीही लवकरच लाखाचा टप्पा पार करण्याची चिन्हे आहेत. गुजरातमध्ये सुमारे 35 हजार बाधित आढळले आहेत.
करोनाबाधित आणि बळींच्या संख्येत मोठी भर पडत असल्याने देशात चिंतेचे वातावरण आहे. तसे असले तरी बाधित करोनामुक्त होण्याचे वाढते प्रमाण मोठा दिलासा देणारे ठरत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात सध्या 2 लाख 35 हजारांहून अधिक सक्रिय बाधित आहेत. तर आतापर्यंत सुमारे 3 लाख 95 हजार बाधित बरे झाले आहेत. करोना संसर्ग झालेले रूग्ण बरे होण्याचे देशातील प्रमाण 60.80 टक्के इतके झाले आहे.