मुंबई – भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आयसीसीच्या स्पर्धांमध्ये आजवर विजेतेपद पटकावलेले नाही. भारतीय संघाचा हाच अपयशी आलेख पुसून काढण्यावर भर देणार आहे, असे मत भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त झाल्यावर माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. टी-20 विश्वकरंडक स्पर्धा संपल्यावर लगेचच न्यूझीलंडचा संघ भारताच्या दौऱ्यावर येत असून, हीच मालिका द्रविडसाठी मुख्य प्रशिक्षकपदावर यशस्वी ठरण्यासाठी पहिली परीक्षा ठरणार आहे.
रवी शास्त्री यांचा कार्यकाळ सध्या सुरू असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेनंतर संपत असून, त्यांच्या जागी द्रविडची नियुक्ती केल्याचे बीसीसीआयने बुधवारीच जाहीर केले होते. त्याबाबत गुरुवारी द्रविडने माध्यमांशी बोलताना आपल्या भावना व्यक्तकेल्या. शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने सातत्याने सरस कामगिरी केली आहे. विविध मालिका जिंकल्या आहेत. त्यामुळे मला याच कामगिरीला पुढे घेऊन जायचे आहे. भारतीय संघाने कोहलीच्या नेतृत्वात अद्याप आयसीसीच्या एकाही मोठ्या स्पर्धेचे विजेतेपद मिळवले नाही म्हणूनच हा अपयशाचा शिक्का सर्वांत आधी पुसून काढण्यासाठी मी कटिबद्ध राहीन. भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षक बनणे हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे, असेही द्रविडने सांगितले.
न्यूझीलंड संघाचा भारत दौरा
17 नोव्हेंबर रोजी या दौऱ्याची सुरुवात होईल. पहिला टी-20 सामना जयपूरमध्ये, दुसरा सामना 19 नोव्हेंबरला रांचीमध्ये आणि तिसरा व अखेरचा सामना 21 नोव्हेंबरला कोलकाता येथे खेळवला जाईल. या मालिकेनंतर कसोटी मालिकेला सुरुवात होईल. पहिली कसोटी 25 ते 29 नोव्हेंबर दरम्यान कानपूरला, दुसरी कसोटी 3 ते 7 डिसेंबर या कालावधीत मुंबईत होणार आहे. या मालिकेत न्यूझीलंडचा संघ तीन टी-20 व 2 कसोटी सामने खेळणार आहे.